रोजच्या जगण्याच्या धावपळीमध्ये आपण अनेकदा गोष्टी विसरून जातो. वर्तमानाच्या धामधुमीमध्ये जुन्या सुगंधी आठवणींचा दरवळ विसरून पुढे जातो. आणि मानवी स्वभावच असा आहे की, ज्या गोष्टी चांगल्या वाटतात त्या आपल्याला कमी लक्षात राहतात आणि जे खटकत असतं, जे त्रासदायक असतं तिकडेच जास्त लक्ष जातं. जे चांगलं आणि उत्तम होतं ते आपण लक्षात ठेवत नाही. आणि पुढे जाताना मागची वाटसुद्धा आपल्या नजरेसमोरून दिसेनाशी होती. आपली मुळं आणि आपला आरंभ आपल्या डोळ्यांसमोर नसतो. म्हणून अशाच नितांत सुंदर आठवणींच्या अत्तराच्या कुपीला उघडण्याचा हा प्रयत्न.
जेव्हा आपण जुन्या जगातल्या गोष्टी आठवतो तेव्हा आपल्याला जाणीव होते की जुनं जग किती समृद्ध होतं. आणि आपल्याला जे लाभलं होतं ते किती सुंदर होतं. तेव्हा त्याचं मोल जितकं जाणवलं नसेल त्याहून त्याचं मोल आज कळतं. काळ, परिस्थिती, जीवनशैली बदलली तरी छोट्या गोष्टी किती आनंददायी होत्या ही जाणीव होते. ताजेपणाचा शिडकावा होऊन एक नवीन दृष्टीही मिळते. त्यामुळे अधून मधून जुन्या जगामध्ये फेरफटका मारणं उपयोगाचं असावं.
ह्या आठवणी आहेत माझ्या नांदेडच्या आजीच्या म्हणजे कै. कालिंदी गजानन फाटक ह्यांच्या! मला लहानपणी दोन आजी- आजोबांचा भरपूर सहवास मिळाला. जे परभणीला सोबत राहायचे ते आजी- आजोबा हे नुसते आजी- आजोबा होते तर नांदेडला राहणारे आजी- आजोबा नांदेडचे आजी आजोबा होते! आणि त्या आजी- आजोबांची भेट काही नेहमी होत नसल्यामुळे तिथे होणारे लाड जास्त असायचे. आजोबांच्या आठवणी मागच्या वर्षी ते गेले तेव्हा लिहील्या होत्या. त्याच वेळी जाणवलं होतं की, नांदेडच्या आजीच्या म्हणजे कालिंदी आजीच्या तर त्याहूनही किती जास्त आठवणी आहेत! आजीला जाऊन आज ९ वर्षं होतील. म्हणून ह्या अत्तराच्या कुपीला उघडण्याचा हा प्रयत्न.
लहानपणीच्या सगळ्यांत जवळच्या व्यक्तींमध्ये- लाड आणि कौतुक करणार्यांमध्ये आजी अगदी पुढे होती. कोवळ्या वयात मिळालेला स्वीकार आणि प्रेम बहुमोल असतं. वामन मूर्ती, सौम्य आणि हळुवार स्वभाव आणि चेहर्यावर हसू. आठवणींचा पेटारा सांगतो की, आजीसोबत आम्ही नातू व नातींनी किती तरी मजा केली आहे. तिच्याकडून ऐकलेल्या गोष्टी, तिने सांगितलेले किस्से आणि विनोद, तिने आवडीने खाऊ घातलेले पदार्थ (ही बाब तर आता हळुहळु नामशेष होण्याइतकी दुर्मिळ होते आहे), तिच्या हातची चव, स्वयंपाकाचा तिचा उत्साह आणि अर्थातच दुपारच्या जेवणानंतरचे पत्त्यांचे असंख्य डाव! "निरू, काय सुरेख पत्ते आहेत तुझे! दोन एक्के, सगळे रथी महारथी तुझ्याकडेच! आणि मला तर अगदी रद्दी, एक हात मुश्किलीने होईल!" हा संवाद तर नेहमीचा होता! त्याशिवाय वेगवेगळ्या पुस्तकांबद्दल ती गोष्टी सांगायची. विनोबांची गीताई तिला विशेष आवडायची. समाजातले महापुरुष, समाज सुधारक, देशभक्त आणि क्रांतीकारक ह्यांच्याबद्दलही ती खूप काही सांगायची, (सांगत असे म्हणायला पाहिजे). हे लिहीताना तेव्हाची भाषाही वेगळी असल्याचं जाणवतंय. तेव्हा "निजायची वेळ झाली, गाडीत फार रेटारेटी होती का, दिवेलागणीची वेळ झाली, चांगलंच गरजतंय, बहुधा सर येणार" अशी वाक्यं ऐकल्याचं आठवतंय. आज हे शब्द आपण फार वापरत नाहीय, हेही जाणवतंय.
![](https://1.bp.blogspot.com/pw/AP1GczOEcMR5ucFwdEYol3QfhAcQ3FwEYU8hnFpXq05RnenshB9bGwaa6b5p45azELsM-IS09lYSbj3fz6FlKHmsQT5rw-TYwczqYhvPEmHltdTDxblNZcgEcCcSSUcW9vP8WfUnY46U-6TPS8VxNkxLj_LuCg=w326-h400?authuser=0)