Showing posts with label 15th August. Show all posts
Showing posts with label 15th August. Show all posts

Saturday, November 12, 2011

लदाखची भ्रमणगाथा: भाग ९

दिस्कितच्या शाळेतला स्वातंत्र्य सोहळा

जम्मु- काश्मीरमध्ये सेनादलांना असलेला विशेष अधिकार कायदा मागे घेण्यावरून चर्चा होत असताना व नियंत्रण रेषेपलीकडे पाकिस्तानने अधिक शस्त्र गोळा करून ठेवलेली असताना भ्रमणगाथेतला पुढचा भाग लिहितोय. मनात राहून राहून विचार येतो, की आम्ही पाहिलेल्या काश्मीरमध्ये आत्ता नक्की कशी परिस्थिती असेल? ते वातावरण, तिथली दाहकता ह्यांचा आम्हांला अनुभव असा आलाच नाही. तसंच तिथली थंडी. आता तर काश्मीरमध्ये फार मोठ्या परिसरात बर्फ पडतोय व ब-याच भागांमधलं दळणवळण ठप्प पडलं आहे.........

चौदा ऑगस्टच्या संध्याकाळी हुंदरमध्ये एकाच वेळी वाळवंट, समुद्र, पहाड, नदी, बर्फ इत्यादि अविष्कारांचा अनुभव घेऊन हॉटेलमध्ये गेलो. हुंदर हे गाव लहानसं असलं तरी पर्यटनामुळे व सेनेमुळेसुद्धा टापटीप दिसत होती. विदेशी पर्यटकांचा ओघ सतत सुरू असल्यामुळे रस्ते, वसाहती, हॉटेल व्यवस्थित होते. हा परिसरच फार आल्हाददायक होता. एकदा खार्दुंगला ओलांडून नुब्रा खो-यात आल्यानंतर सर्व कमी उंचीचा पठारसदृश भाग आहे. इथली उंची ३१४४ मीटर्स म्हणजे लेहपेक्षासुद्धा कमी आहे. इतक्या पर्वतमाथ्यांवरून गेल्यानंतर उंची काहीच वाटत नव्हती.

आम्हांला पंधरा ऑगस्ट सेनेच्या कार्यक्रमामध्ये साजरा करायचा होता. पनामिकला जाताना भेटलेल्या सेनेच्या जवानांकडे चौकशी केली होती. तेव्हा ते बोलले होते, की हुंदरमध्ये सेनेच्या कँपवर आम्ही पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतो. आमचे ड्रायव्हर हैदरभाईंनी त्याची चौकशी केली व आणखी माहिती मिळवली. तिथे त्यांना कळालं, की इथे आर्मीचे युनिटस तर आहेत; पण ते त्यांची परेड प्रत्येकाच्या युनिटमध्ये आतच करतात व ती सार्वजनिक नसते. त्यामुळे आम्ही त्यामध्ये सहभागी होऊ शकत नव्हतो. म्हणून मग पंधरा ऑगस्टला दिस्कित गावातल्या एका प्रमुख सरकारी शाळेमधल्या कार्यक्रमामध्ये जायचं ठरलं.

हुंदरमधली रात्र...... थंडी तर होतीच..... पण शांतता आणि प्रसन्नता..... एका आगळ्यावेगळ्या ठिकाणी असल्याचा अनुभव व भारताच्या उत्तर सीमेच्या जवळ असल्याचा अनुभव.......... १४ ऑगस्टला श्रीनगरमध्ये काय परिस्थिती असेल, ह्याचा विचार मनात येत होता. १५ ऑगस्टपेक्षा श्रीनगर व काश्मीर खो-यातल्या लोकांना १४ ऑगस्टचंच महत्त्व अधिक.......

दुस-या दिवशी सकाळी ९ वाजता दिस्कितमधल्या शाळेत पोचायचं होतं. रात्री थंडी होती; पण शांत झोप लागली. सकाळी लवकर उठून आसपासचा परिसर बघितला... सर्वत्र डोंगर आणि मध्ये मध्ये बर्फ..... अद्भुत नजारा होता. जरी हा काहीसा सपाट भाग असला; तरीही पहाड लागूनच होते. अद्भुत नजारा......


आमचं हॉटेल आणि मागे दिसणारी उंच झाडं आणि पर्वत



आमचं हॉटेल




हुंदरपासून दिस्कित जवळच; त्यामुळे आरामात निघालो. इथले हॉटेलवालेही खूप चांगले होते. सर्व सेवा उत्तम होती. तिथे विदेशी पर्यटकही दिसत होते. हवामान किंचित ढगाळ होतं. रस्त्यावर सगळीकडे शाळेत जायला निघालेले मुलं दिसत होते. त्यातले बरेच जण लिफ्टही मागत होते. पुढे काही विद्यार्थ्यांना हैदरभाईंनी गाडीत घेतलं. त्यांची बोलीभाषा वेगळीच होती; पण त्यांना हिंदीसुद्धा नीट समजत होती. ध्वजारोहण कार्यक्रमाची जागा हैदरभाईंनी त्यांना विचारून घेतली. लवकरच त्या ठिकाणी पोचलो. रस्त्यावर सर्वत्र विद्यार्थ्यांची वर्दळ दिसत होती.

कार्यक्रमासाठीची जागा मोठी होती; जिल्हा पातळीवरील सरकारी शाळा असल्यामुळे ब-यापैकी पटांगण व इमारत होती. आम्ही पोचलो तेव्हाच तिथे बरेच लोक जमले होते; विद्यार्थी येऊन बसत होते व बरेचसे सादरीकरणाची तयारी करत होते. एका शिक्षकांच्या सांगण्यावरून आम्ही स्टेजच्या जवळच्या खुर्च्यांमध्ये बसलो. मनात उगीचच भिती वाटली, की आम्हांला स्टेजवर बोलावतील की काय.

कार्यक्रम सुरू होण्यास बराच वेळ होता. हळुहळु लोक जमत होते. इतर शाळांमधले विद्यार्थी येत होते. गर्दी वाढतच होती. मग हळुहळु कार्यक्रमाआधी देशभक्तीची गाणी सुरू झाली; मधून मधून निवेदन.... देशामध्ये इतर ठिकाणी जसा होत सोहळा असेल, तसाच इथेही होत होता. काहीच फरक नाही. उलट इथे तर लोकांचा, विद्यार्थ्यांचा उत्साह कितीतरी जास्त दिसत होता. ह्याचं एक कारण हे असावं, की इथे इतर फारसे सार्वजनिक कार्यक्रम होत नसावेत. त्यामुळे हा कार्यक्रम लोकांसाठी विशेष होता.


कार्यक्रमाची पूर्वतयारी चालू असलेली दिसते




कार्यक्रमासाठी येणारे लोक


प्रमुख पाहुणे, जिल्ह्यातील प्रमुख सरकारी अधिकारी, सेनेतील अधिकारी हे आल्यावर कार्यक्रम सुरू झाला. एनसीसीच्या कॅडेटस व अधिका-यांनी सफाईदार आणि सैनिकी आवाजात सूचना दिल्यानंतर परेड व राष्ट्रगीत सुरू झालं. सर्व लोक उभे राहिले. कार्यक्रम बघण्यास पोलंडच्या पर्यटकांचा एक मोठा समूह आला होता; तेसुद्धा राष्ट्रगीताच्या वेळी उभे राहिल्याचं बघून बरं वाटलं. बरेचसे जण म्हणतही होते. राष्ट्रगीतानंतर मानवंदना देण्याचा कार्यक्रम झाला. सर्व एनसीसी व इतर विद्यार्थी कोअर्सनी परेड दिली. त्यानंतर मग दोन- तीन भाषणं झाली. निवेदनाची भाषा लदाखी, उर्दू आणि हिंदी होती. भाषण करणारे केंद्रीय प्रशासन सेवेतील अधिकारी असल्यामुळे त्यांचं हिंदी चांगलं होतं.


एकसाथ परेड शुरू करेंगे शुरू कर......








भाषणं चालू असतानाच आमच्या शेजारी बसलेल्या एका वृद्ध लदाखी गृहस्थांनी आम्हांला एक माहिती दिली, की कुठेतरी मोठा अपघात (हादसा) होऊन कित्येक लोक ठार झाले व त्यामुळे हा कार्यक्रम खूप कमी प्रमाणावर साजरा केला जाणार आहे. त्यांना हिंदीत नीट सांगता येत नव्हतं. कार्यक्रमामध्येही ह्याची घोषणा लदाखीमध्ये केली गेली होती; पण ती समजू शकली नाही. कुठे तरी मोठा अपघात/ दुर्घटना झाली, इतकंच आम्हांला समजू शकलं.

भाषणामध्ये नेहमी असतात त्याच गोष्टी होत्या. काश्मीरमुळे वेगळं काही असेल, असं वाटलं होतं, पण तसं नव्हतं! लदाखमध्ये खरोखर फुटिरता कुठेच आढळली नाही. देश कसा स्वतंत्र झाला, आज देश व आपण स्वातंत्र्यामध्ये कसे प्रगती करत आहोत, सेना देशाचं व आपलं रक्षण कसं करते आहे, आपल्याला पुढे जायचं आहे, अशा दिशेची भाषणं झाली.

“दूध मांगेंगे तो खीर देंगे; कश्मीर मांगेंगे तो चीर देंगे...”

हा उल्लेख भाषणात ऐकून बरं वाटलं. तरी मनामध्ये नकळत श्रीनगरमधल्या अशा कार्यक्रमांबद्दल वाचलेलं व ऐकलेलं आठवत होतं.

पुढे विद्यार्थांच्या सादरीकरणास सुरुवात झाली. अत्यंत सुंदर व आकर्षक परफॉर्मन्स होते ते! विशेष म्हणजे जे जे परफॉर्मन्स झाले; त्यामध्ये असलेले सर्व गट तिरंगी राष्ट्रध्वज आपल्या पोशाखामध्ये व सादरीकरणामधून दर्शवत होते! सादरीकरणामध्ये देशभक्तीच्या गीतांवर नृत्य, गांधीजींचा प्रसंग, लोककला व लोकनृत्य इत्यादि प्रमुख होते. सादरीकरण करणा-यांमध्ये बहुतांश मुलीच होत्या. मुलांचा समावेश असलेलं सादरीकरण ब-याच उशीरा करण्यात आलं.












तोपर्यंत जवळजवळ तीनशेपेक्षा जास्त लोक तिथे जमले होते. शाळेच्या प्रवेशदाराच्या बाहेरही कित्येक लोक उभे राहून बघत होते. सर्वत्र जल्लोष आणि उत्स्फूर्त उत्साहाचं वातावरण होतं. ‘छोडो कल की बाते’ ह्या गाण्यावर केलेलं सादरीकरण विशेष लक्षात राहिलं. ह्या गाण्याचे तीन कडवे माहीत होते; पण तिथे अजून दोन कडवे असलेलं गाणं आकर्षक प्रकारे सादर केलं. मुलांमध्ये कमालीचा उत्साह होता. हे ह्या काही क्षणचित्रांवरून कळून येईल.

इतके सुंदर परफॉर्मन्स चालू होते व वातावरण इतकं उत्साही होतं, की जावंसं वाटतच नव्हतं. सतत लोक येत होते व कार्यक्रम बघत होते. आपल्याइथल्या पद्धतीच्या विपरित इथे प्रमुख पाहुण्यांव्यतिरिक्त जवळजवळ प्रत्येकाला चहा व नाश्ता देण्यात आला. पोलिश पर्यटकही थांबून कार्यक्रम बघत होते.


कार्यक्रमाच्या ठिकाणाहून दिसणारे पर्वत............... शब्दातीत......




गांधीजींचा प्रसंग साकारताना विद्यार्थी!


बराच वेळ कार्यक्रम बघितल्यावर उशीर होईल, असे वाटल्याने इच्छेविरुद्ध उठावं लागलो. गेटजवळ आल्यावर हैदरभाई भेटले; ते आमचीच वाट पाहत होते. अखेरीस तो सोहळा अर्धाच सोडून आम्ही दिस्कितमधून निघालो..........

प्रवास आधी आलो होतो; त्याच मार्गाने होता. दिस्कितहून विराट बुद्धमूर्तीच्या जवळून श्योक नदी- पात्रालगत जाणा-या रस्त्याने खालसरच्या दिशेने निघालो. अफाट परिसर होता तो. जणू ख-या विश्वापासून लांब आम्ही एका वेगळ्याच विश्वामध्ये संचार करत होतो. वाटेत एका ठिकाणी वाहनं किंचित अडकली होती. तिथे इतर ड्रायव्हर्सना हैदरभाईंनी हवामानाबद्दल विचारलं. हवामान फारसं ठीक नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच लेह- मनाली रस्त्यावर हिमाचल प्रदेशमध्ये एका ठिकाणी एका मिनी बसला अपघात होऊन तिथल्या १५ ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी जात असलेले लदाखचे २१ कलाकार मृत्यूमुखी पडले, ही माहितीही मिळाली. ह्यामुळेच स्वातंत्र्य सोहळ्यानंतरचा कार्यक्रम मर्यादित ठेवण्यात आला आणि हेही कळालं, की लेहमध्ये तर स्वातंत्र्य सोहळा फारच मर्यादित प्रमाणात झाला.



खार्दुंगला ओलांडण्यासाठी घाई केली पाहिजे, असं हैदरभाईंनी सांगितलं व आम्ही पुढे निघालो. नदीच्या पात्रातून व वाळवंटातून जाणा-या रस्त्याने खालसरपर्यंत आलो व तिथून परत खार्दुंगच्या दिशेने निघालो. वाटेत एका ठिकाणी जेवण करून घेतलं. आलू पराठा उत्तम मिळाला. आता सरळ सत्तर किमी घाटाचा व चढाचा रस्ता होता. वाहनं फारशी लागत नव्हती. नुब्रा खोरं आणि श्योक नदी मागे व खाली लांब राहिली. हळुहळु आमची उंची परत वाढत चालली. खार्दुंग आलं. पुढे नॉर्थ पुल्लूला तपासणीसाठी थांबलो. बर्फाळ हवा व थंड वा-यामध्ये रस्त्यावर थोडं फिरत होतो. एक जण बुलेटवरून खार्दुंगला ओलांडून नॉर्थ पुल्लूमध्ये आला. तपासणीसाठी त्याने गाडी स्टँडवर लावली आणि तो सरळ कोसळला!! लगेचच आसपासचे लोक तिथे धावले व त्याला उचलून घेतलं. हवामान खराब होतं व त्यामुळे त्याला आणखीनच त्रास झाला. शिवाय ऑक्सीजन कमी असल्यामुळेसुद्धा चक्कर आली.

त्यावेळी आम्हांला कळालं; की बाईकवरून लदाखच्या अतिदुर्गम भागात जाण्याची आमची योजना किती अशक्यप्राय होती. ज्याप्रमाणे हिमालयामध्ये मध्यम उंचीच्या शिखरांवर मोहीम करताना स्थानिक शेर्पा, गुरखा लोकांची किंवा खेचरांची, तट्टांची मदत घ्यावी लागते; त्याप्रमाणे बाईकवर इथे यायचं असेल, तर स्थानिक लोकांना सोबत घेऊनच यायला हवं हे जाणवलं. कारण त्याशिवाय कोणत्याच प्रकारे टिकाव लागणं शक्य नाही, हे दिसत होतं. म्हणजे रस्ता अतिदुर्गम होता, असं नाही. रस्ता त्या मानाने कितीतरी चांगला होता. शक्य त्या सर्व ठिकाणी उत्तम स्थितीत होता. रस्त्यापेक्षाही सर्वसाधारण परिस्थिती, ऑक्सीजनची कमतरता; सततच्या प्रवासाचा व भौगोलिक फरकाचा ताण, बर्फामुळे व उंचीमुळे होणारा परिणाम, वाटेमध्ये मॅकेनिक किंवा दुरुस्ती करणा-यांची अनुपलब्धता हा विचार केला तर बाईकवर यायचं असेल, तर आठ- दहा जणांचा गट तर असलाच पाहिजे व त्यामध्ये किमान दोन जण स्थानिक मार्गदर्शक असलेच पाहिजेत, असं प्रकर्षाने जाणवलं.............

नॉर्थ पुल्लूनंतर खार्दुंगला!!! थोडा वेळ थांबलो. सर्वत्र बर्फ होता........ बर्फाचं राज्य.......... काही क्षण तो अनुभव मनामध्ये साठवण्याचा प्रयत्न सुरू केला आणि मग निघालो..... जाताना सेनेचे ट्रक्स दिसतच होते. उतरताना एक गोरा विदेशी पर्यटक सायकलवर जाताना दिसला. अंगठ्यानेच त्याला ‘बेस्ट लक’ची खूण केली. त्याने हसून उत्तर दिलं. वाटेत हवामानाचा त्रास न होता खार्दुंगलावरूनचा प्रवास ‘चांगला’ झाला.





खार्दुंगला: एका विशेष जगाचं प्रवेशद्वार.....

साउथ पुल्लूवर थोडावेळ थांबलो. थंडी व बर्फ अजूनही होता. पण ह्यावेळी फार त्रास झाला नाही. आरामातच प्रवास पार पडला. लवकरच लेहच्या जवळ आलो. संध्याकाळी पाचच्या आसपास लेहमध्ये प्रवेश केला. इथेही एक गंमत झाली. लवकर जाण्यासाठी हैदरभाईंनी एका नो एन्ट्री असलेल्या रस्त्याने गाडी नेली. पण पोलिसाने पकडून सरळ चावी घेतली. शेवटी करगिलहून आलो आहोत असं सांगून दादा बाबा करत कशी तरी किल्ली परत घेतली व निघालो.

हॉटेलवर जाऊन थोडा आराम केला; इंटरनेट कॅफेमध्ये जाऊन आलो. देशभरातल्या पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमांच्या बातम्या पाहिल्या. त्याचवेळी आधी ऐकलेल्या लेह- मनाली रस्त्यावर केलाँगजवळ झालेल्या अपघाताची बातमी बघायला मिळाली.

हॉटेलवर गेलो तेव्हा तिथे हसनजी आले होते. त्यांनी आम्हांला बरीच माहिती दिली. मनाली रस्त्यावरचा तो अपघात बराच मोठा होता. लदाखहून कलाकारांचं एक पथक हिमाचल प्रदेशामध्ये स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होतं. त्यांच्या गाडीला केलाँगजवळ अपघात झाला आणि २१ कलावंत मृत्युमुखी पडले होते. लदाखच्या युवा कलाकारांपैकी ते होते; त्यामुळे सर्वत्र हळहळ वाटत होती.

हसनजी पुढे म्हणाले, की ह्या अपघातानंतर लेह- मनाली रस्ता धोकादायक झाल्यामुळे तिथली वाहतूक थांबवली आहे. त्यामुळे लेह- मनाली रस्ता बंद झाला आहे. आमचा परत जाण्याचा हाच रस्ता होता!! अर्थात परत जाण्यासाठी अजून एक दिवस होता. आमचा पुढच्या दिवशीचा कार्यक्रम पेंगाँग त्सो सारख्याच त्सो- मोरिरीला जाणे हा होता. आणि तिथला रस्ता अजून तरी चांगला होता. तिथून परत आल्यावर आमचा परतीचा लेह- मनाली रस्ता व हवामान कसं असेल, ह्याची माहिती घेऊन आमचा परतीचा प्रवास ठरणार होता. आम्ही त्सो मोरिरीला जाऊन येईपर्यंत सर्व माहिती व अपडेट घेऊ आणि मग तेव्हाची परिस्थिती बघून आमचा परतीचा प्रवास ठरवू, असं हसनजी म्हणाले.

लेहमध्ये थोडंसं फिरलो आणि दुस-या दिवशी त्सो मोरिरीला जाण्याच्या विचारात झोपलो. मनामध्ये अर्थातच आगळ्या वेगळ्या स्वातंत्र्यदिनाच्या आठवणी होत्या. देशाच्या इतक्या टोकाच्या भागामधल्या लोकांची देशभक्ती बघून धन्य धन्य वाटत होतं.... अर्थात, लदाखच्या कलाकारांचा अपघात, बिघडलेलं हवामान आणि बंद झालेला रस्ता ह्यामुळे “लदाख” किती खडतर आहे, हेही जाणवत होतं. लोकांचं राहणीमान किती खडतर किंबहुना असुरक्षित आहे, बिकट आहे, हे जाणवत होतं. लेह- मनाली रस्ता बंद झाला असता; तर आम्हांला लेह- श्रीनगर रस्त्याने; म्हणजे आलो तसंच परत जावं लागलं असतं.

लदाख...... आता चलो त्सो मोरिरी.......








क्रमश:
पुढील भाग: त्सो मोरिरीच्या आसमंतात.....

Thursday, November 3, 2011

लदाखची भ्रमणगाथा: भाग ८

सियाचेनच्या उंबरठ्यावर आणि लदाखच्या स्वप्नभूमीत.....

काश्मीरमध्ये थंडीची तीव्रता वाढत असताना प्रवासवर्णनाचा हा आठवा भाग लिहितोय. अजूनही त्या अनुभवाचा, त्या भव्य दिव्य विश्वाचा थरार व प्रभाव जाणवतो आहे....... लदाख.......

पेंगाँगवर जाऊन अत्यंत भारावून आणि शरीराने थंड होऊन परत आलो. पेंगाँगवर म्हणजे चीनव्याप्त काश्मीरच्या अत्यंत जवळ गेलो होतो हे ह्यावरून दिसतं. पेंगाँग त्सो........ एक अविस्मरणीय आणि अद्भुत अनुभव......

पेंगाँग सरोवर किती तिबेटमध्ये, किती चीनव्याप्त काश्मीरमध्ये आणि उरलेलं किती भारतात आहे आणि आम्ही नक्की कोणत्या भागात फिरलो आणि कोणत्या भागात फिरणार होतो; ते पुढील नकाशांवरून कळेल.


काश्मीरचा नकाशा. जम्मु- श्रीनगर- करगिल- लेह- चांगला- पेंगाँग


लेह- खार्दुंगला- खालसर- पनामिक व खालसर- दिस्कित- हुंदर.

१४ ऑगस्टला सियाचेनच्या उंबरठ्यावर असणा-या भागात जाण्यास निघालो. सियाचेनची एक झलक ह्या व्हिडिओमध्ये बघता येईल. आमच्या ह्या संपूर्ण मोहिमेचं उद्दिष्ट सियाचेनच्या शक्य तितकं अधिक जवळ जाणं; हेच होतं. सियाचेन.... भारताचा जणू मुकुटमणी.... भारतातील सर्वांत मोठी हिमनदी ही फक्त एक ओळख. त्याव्यतिरिक्त भारताचा भारताच्या ताब्यात असलेल्या सर्वांत उत्तरेकडील भागांपैकी एक मोक्याचा भाग.... पाकव्याप्त काश्मीर व चीनव्याप्त काश्मीर ह्यांच्यावर शह देण्यासाठीचं अतिमहत्त्वाचं केंद्र आणि अर्थातच जगातलं सर्वाधिक उंचीचं रणांगण!! सियाचेनचा शब्दश: अर्थ पांढरे गुलाब हा आहे!! भारत- पाकिस्तानमधील सर्वांत ज्वलंत मुद्दा आणि संघर्षाचा केंद्रबिंदु!! इंदिरा गांधींनी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या असल्या तरी त्यांनी काही चांगल्या व हिमतीच्याही कृती केलेल्या आहेत. त्यामध्ये सियाचेनचा सैनिकी ताबा घेणं व सिक्कीम भारतामध्ये समाविष्ट करून घेणं ह्या आहेत.

सियाचेन अतिदुर्गम आहे. सियाचेन म्हणजे त्याचा माथा- सियाचेन ग्लेशियर (हिमनद) आणि सियाचेन बेसकँप; जो लेहपासून साधारण अडीचशे किमी उत्तरेकडे आहे. सियाचेन ग्लेशियरवर आजवर जेमतेम दोन ट्रॅकिंगच्या मोहिमा गेल्या आहेत. तिथे सामान्य माणूस जाऊ शकत नाही; कारण उंची साडे सहा हजार मीटर्सपेक्षा अधिक आहे व ते अतिदुर्गम आहे. सियाचेन बेस कँपच्या पुढे आठ- दहा दिवस ट्रेक केल्यावर तिथे जाता येतं. आम्हांला सियाचेन बेसकँपवर जायचं होतं; पण त्यासाठी अनुमती मिळू शकली नाही. हा अत्यंत महत्त्वाचा सैनिकी गोपनीय भाग. त्यामुळे तिथे काय; पण त्याच्या कित्येक आधी असलेल्या पनामिक ह्या गावाच्या पुढे नागरी लोक (सिविलियन्स) जाऊ शकत नाहीत.... त्यामुळे आम्हांला नाईलाजाने पनामिक व हुंदर ह्या सियाचेन बेस कँपपेक्षा सुमारे शंभर किमी अलीकडे असलेल्या गावीच जाता येणार होतं........ पण सियाचेन इतका उंच व भव्य आहे; की निदान त्याच्या उंबरठ्यावर पोचण्याचं समाधान मिळणार होतं........

१४ ऑगस्टच्या सकाळी सहा वाजता निघालो. आमचा साथीदार- परीक्षितला डॉक्टरांनी येण्याची अनुमती दिली होती. फक्त जाताना खार्दुंगलावर थांबू नका, असं म्हणाले. पेंगाँगच्या रस्त्यावर जसा चांगला हा रखवालदार होता; तसा नुब्रा खोरे आणि सियाचेनच्या ह्या रस्त्यावर खार्दुंगला हा चौकीदार...... आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो जगातला सर्वोच्च मोटोरेबल रस्ता होता! शब्दातीत अनुभूतीच्या ओढीने सकाळी प्रवास सुरू झाला... आम्ही तिघं जण- मी, गिरीश, परीक्षित आणि अर्थातच हैदरभाई. आणि स्कॉर्पियोसुद्धा! ह्या थरारक प्रवासाला निघालो......




लेहमधून बाहेर पडताना दोन दिवस आधी पाहिलेल्या शांतीस्तुपावरून गेलो. लेहपासून जेमतेम चाळीस किमीवर खार्दुंगला आहे. लेहची उंची ३५०५ मीटर्स आहे; तर खार्दुंगलाची ५६०२ मीटर्स फक्त. ह्याचाच अर्थ ह्या चाळीस किमीच्या आतमध्ये उंची सरळ झेप घेऊन दोन हजार पेक्षा अधिक मीटर्सनी वाढणार......... निव्वळ भन्नाट...... त्या उंचीवर शब्द पोचू शकत नाहीत........


खार्दुंगला घाटाच्या रस्त्यावरून खाली लांब दिसणारं लेह शहर आणि ओळखू येणारा शांतीस्तुप...........




उंचावरून खोलवर दिसणारे लेह शहर व आसपासचा भाग (हिरवळ व शांतीस्तुपाचा ठिपका)


बर्फ................. आणि छोटे दिसणारे ट्रक्स....


अद्भुत नजा-याची फक्त सुरुवात......

लेह शहराच्या बाहेर गेल्यावर लगेच चढ सुरू झाला. मोठे मोठे पहाड समोर दिसत होते. बर्फाच्छादित हिमशिखरं जवळ येत होती. बरंच पुढे येऊनसुद्धा शांतीस्तुप दिसत होता. हळु हळु तो ठिपक्याएवढा झाला; पण लांबूनसुद्धा ओळखू येत होता. ही उंची न थांबता जाण्यासाठी थोडी अवघड होती. त्यामुळे मध्ये दोन ठिकाणी थोडा वेळ थांबलो. हॉटेल, थांबायला जागा असा प्रकार नाहीच. घाटामध्येच जिथे जरा मोकळी जागा दिसेल, तिथे गाडी बाजूला घेऊन थांबायचो. गंमत म्हणजे फक्त माणसालाच नाही; तर गाडीलासुद्धा इतकी उंची चढताना ब्रेकची गरज होती!

हवामान ह्यावेळीही तसं चांगलं नसल्यामुळे ढग आलेले होते व नेहमी उन्हाळ्यात पडते त्यापेक्षा जास्त बर्फ पडत होता.... आमच्यासाठी ही अभूतपूर्व पर्वणीच होती...... बराचसा चढ येईपर्यंत रस्ता चांगला होता! (चांगला शब्द आता चांगलाच मनात कोरल्या गेला आहे....) घाट अगदी तीव्र होता. वाटेत अनेक वेळेस सेनेच्या ट्रक्सचा काफिला विरुद्ध बाजूने जात होता. नक्कीच सियाचेनहून ते परत जात असावेत.....

खार्दुंगलाच्या काही किमी आधी साउथ पुल्लू हे एक चेकपोस्ट लागतं. इथे आमच्या वाहनाची व इनर लाईन परमिटसची तपासणी झाली. असे चेकपोस्ट दुर्गम व नियंत्रण रेषेच्या तुलनेने जवळ असलेल्या सर्वच भागांमध्ये असतात. तिथेच एक हॉटेल होतं; त्यामध्ये नाश्ता कम जेवण करून घेतलं. अत्यंत थंड वारे अंगाला झोंबत होते. गरम चहाच्या वाफेमुळे जरा मदत मिळत होती. अर्थात फक्त काही क्षणच. कारण तिथे चहा किंवा गरम पाणीसुद्धा जास्त वेळ गरम राहत नाही. थोडा वेळ ब्रेक मिळाल्यामुळे बरं वाटलं. अर्थात साउथ पुल्लूची उंचीसुद्धा फार वेळ तिथे थांबावं अशी नव्हती.....

पुढे अर्ध्या तासाने खार्दुंगला आला................. हवामान खराब असल्यामुळे नेहमीइतकी गर्दी नव्हती, असं हैदरभाई म्हणाले. खार्दुंगलाचं हवामान चांगलापेक्षा अजून बिकट असल्यामुळे इथे सेनेतर्फे चहा दिला जात नाही. पण इथे एक कॅफेटेरिया आहे. जगातला सर्वांत उंचीवर असलेला कॅफेटेरिया, असा मान तो मिरवतो. खार्दुंगला हा जगातला सर्वांत उंच मोटोरेबल (वाहन जाण्यास योग्य) रस्ता आहे, असं म्हंटलं जातं. साउथ पुल्लूच्या पुढे रस्ता अर्थातच कच्चा व त्या वेळी बर्फमय होता. पण इतक्या उंचीवर रस्ता व दळणवळण आहे, हीच मुळात आश्चर्यकारक गोष्ट आहे...... धन्य सीमा सडक संगठन (बीआरओ!)


खार्दुंगला!! तिथेही गोम्पा आहेच!


बर्फही बर्फ हो; सर्दियों का हो मौसम........




बी.आर.ओ.चा फलक आणि तिबेट पद्धतीचे मंत्र लिहिलेल्या पताका


खार्दुंगलाचे रक्षक


हिमाय तस्मै नम:


खार्दुंगलाहून दिसणारी काराकोरम पर्वतरांग व त्या दिशेचे अन्य पर्वत.......


सर्वाधिक उंचीवरील कॅफेटेरिया!!


हात सियाचेनची दिशा दर्शवतो.......


पांढरा शुभ्र!!


सीमाएँ बुलाए तुझे चल राही.... सीमाएँ पुकारे सिपाही.....

खार्दुंगलावर थांबू नये; असं सांगितलं असतानाही थांबण्याचा मोह अनावर झाला. थोडंसं फिरलो. फोटो काढले. पण चांगलाचा अनुभव चांगलाच असल्यामुळे फाजील उत्साह दाखवला नाही. खार्दुंगलाची उंची इतकी जास्त आहे; की तिथून अत्यंत दूर असलेली काराकोरम पर्वतरांग दिसते! काराकोरममध्येच के२ हे सर्वोच्च शिखर आहे व ते पाकव्याप्त काश्मीरच्या टोकाला दूरवर आहे. ते नाही; पण बर्फामध्ये समाधिस्थ झालेली काराकोरम पर्वतरांग व सियाचेनच्या आसपासचे पर्वत आम्ही पाहू शकलो..... काश्मीरमधल्या कोणत्याही भागाप्रमाणे इथेसुद्धा पराक्रमाची पर्वतशिखरं आहेत. काश्मीरमधले अनेक पर्वतशिखर आपल्या नियंत्रणात नसतील; परंतु आपल्याजवळ अगणित सैनिकांचे, वीरांचे आणि श्रमिकांच्या पराक्रमाची शिखरं आहेत.....

खार्दुंगलापासून पुढे घाटाचा उतार आहे. साउथ पुल्लु हे परतीच्या मार्गावरचं चेकपोस्ट आहे. तिथून पुढे खार्दुंग गाव लागतं; ज्या गावामुळे ह्या घाटास खार्दुंगला नाव मिळालं. गाव लहानसंच आहे. इथून पुढे अखंड उतार सुरू..... पण सर्वत्र बर्फाने शुभ्र छत्र धरलेलं. सर्वत्र एकाहून एक उंच पहाड व बर्फच बर्फ दिसत होता. सरळ समोरच्या दिशेत दिसणारे उंच पहाड सियाचेनच्याच मार्गावरचे होते.....



वाटेत थांबण्यासारखं हॉटेल मिळालं नाही. त्यामुळे सरळ पुढे जात राहिलो. अखंड उतार सुरू होता. अर्थातच तीव्र वळणांनी भरलेला. एकामागोमाग एक पहाड जातच आहेत; तरीही जमीन खाली कुठेतरी दूरवर असावी असं वाटत आहे.... तीव्र उतार व त्याआधीची उंची ह्यामुळे थोडं बरं वाटत नव्हतं. शरीराने परत सूचना दिली होती, ‘गड्या तुला जमीनच चांगली...’ पण जमीन लवकर येईचना!! नुसता उतार. अक्षरश: खार्दुंगलापासून पुढे सुमारे साठ- सत्तर किमी नुसता उतार आहे. खालसर हे गाव जवळ आल्यावर खाली जमीन जवळ आल्यासारखी दिसते आणि मग उजवीकडे दरीमध्ये श्योक नदीचं पात्र दिसायला सुरुवात होते. नुब्रा व्हॅली!! खरोखर ही एक लांब प्रदीर्घ पसरलेली दरीच आहे. म्हणूनच खार्दुंगला व पुढच्या सर्व भागाला नुब्रा व्हॅली म्हणतात. इतकी मोठी दरी की जणू पाताळच.... खाली जातोय; खाली जातोय आणि अजून जातोय.... जमीन दूरच आहे...


दरी संपूर्ण उतरल्यावर जमिनीचा तळ लागला...




खडे पहाड आणि पठार.....




पर्वतांनी वेढलेलं पठार व नदी.....




दूरवरून दिसणारे खालसर... नुब्रा खो-याची सुरुवात....

खालसरमध्ये एक रस्ता डावीकडे दिस्कित व हुंदरकडे जातो आणि मुख्य रस्ता सरळ समोर पनामिककडे जातो. पनामिक हे उष्ण झ-यांचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. इथपर्यंत पर्यटक किंवा सिव्हिलियन्स येऊ शकतात. पनामिकच्या पुढे सेसेर ला, ससोमा अशी गावं गेल्यावर सियाचेन बेस कँप येतो. तिथे सहसा सिव्हिलियन्स जातच नाहीत. आमचा इनर लाईन परमिट पनामिकपर्यंतच होता. तरीसुद्धा तिथून आणखी पुढे जाऊन तर बघू, असा आमचा विचार होता. पण हैदरभाईंनी आम्हांला थांबवलं. ते म्हणाले की, पनामिकपर्यंत आम्हांला लेह कमिशनरने परमिशन दिलेली आहे; तिथून पुढे पनामिकच्या बाहेर गेल्यावर जे-के पोलिसांचं तपासणी नाकं आहे आणि ते आम्हांला निश्चितच अडवणार. कारण ते म्हणाले, की अनेक वेळेस सेनेचे अधिकारी स्वत:च्या ओळखीने अनेक पाहुण्यांना किंवा सिव्हिलियन्सना पुढे घेऊन जातात; पण परत येताना त्यांना जे- के पोलिस अडवतात; कारण त्यांच्याकडे अधिकृत परमिट नसतो.... ह्यातून खटलेही उभे राहतात..... थोडक्यात आम्ही पनामिकच्या पुढे जाऊ शकत नव्हतो. त्यासाठी दिल्लीतल्या संरक्षण मंत्रालयाच्या विशेष परमिशनची गरज होती; जी आम्ही घेऊ शकलो नव्हतो.

तरीही, अगदी तरीही, पनामिकच्या त्या अनामिक आणि अपूर्व भागाकडे जाताना भावातीत थरार जाणवत होता...... जिथपर्यंत सिव्हिलियन्स जाऊ शकतात; त्या भारताच्या नियंत्रणातील सर्वांत उत्तरेला असलेल्या भागात आम्ही जात होतो. तसंच तुलनेने इथून प्रत्यक्ष सीमासुद्धा (म्हणजे नियंत्रण रेषेपलीकडील आंतर्राष्ट्रीय सीमा) फार लांब नाही.... जणू भारताच्या उत्तर टोकाजवळ आम्ही पोचलो होतो. शब्द त्या उंचीवर, “त्या ठिकाणी” पोचू शकत नाहीत...

खालसरमध्ये सैनिकी चेकपोस्टवर एका सैनिकाने आमच्या गाडीची व आमची तपासणी केली. तो मराठी माणूस होता! मग काय!! मजा आली; सर्वांनाच आनंद झाला. आमच्याकडील लाडू त्यांना दिले. सियाचेन इथून दिसतं का, अजून किती लांब आहे, इत्यादि माहिती विचारली. ते बोलले, की अजून पुढे सुमारे शंभर किमीवर सियाचेन बेस कँप आहे; आणि एकामागोमाग एक अत्युच्च शिखरे असल्यामुळे सियाचेनचं शिखर दिसू शकत नाही.... हेही नसे थोडके........ आज नाही; तर उद्या........






रौद्र-रमणीय


रुक्ष पहाडांनंतर अशी नदी म्हणजे........ जीवनदायीनी.....


गोम्पा आणि लदाख........ अतूट नातं


श्योक नदीचे विशाल पात्र

खालसरपासून सतत श्योक नदी सोबत करत होती. ही सियाचेनच्या पर्वतरांगांमध्येच उगम पावणारी नदी. प्रवाह बराच मोठा होता. खालसरपासून पुढे रस्ता व आसपासचा प्रदेशसुद्धा बराच समतल झाला. एक मोठं पठार असावं. अर्थात भन्नाट असे पहाड किंचित लांबवरून सोबत करतच होते. उंची कमी झाल्यामुळे कुरणं, चरणारी जनावरं (त्यांचीही कातडी जाड व केसाळ; अगदी कुत्रासुद्धा!) व थोडी शेती बघायला मिळाली. रस्त्यावर वाहतूक अत्यंत विरळ होऊन गेली. बरेचसे लोक खार्दुंगलावरूनच परत जातात. काही दिस्कित- हुंदरकडे जातात. अर्थात सैनिकी वाहतूक मोठ्या प्रमाणात दिसत होती. सियाचेन व अन्य ताबारेषेलगतच्या भागांना रसद पुरवठा करणारी वाहने!! खरोखर लक्ष्यचाच हा प्रदेश होता.....


हाँ यही रस्ता है तेरा..... तुने अब जाना है.....

आणि कितीही वेळा ऐकलं तरी परत परत ऐकावंसं वाटणारं हे गाणं.

अब जो भी हो; बादल बन कर पर्वत पर है छाना......


........ पनामिक गावामध्ये जेवण केलं. तोपर्यंत बरं वाटायला लागलं (जमीन जवळ आली होती ना). पनामिक गावाच्या सुरुवातीला उष्ण पाण्याचे झरे आहेत. गंधकयुक्त पाणी पर्वतातून वाहतं व त्या ठिकाणी बघण्यासाठी ओटा, हौद, पाय-या इत्यादि केलेले आहेत. इथले पर्वत विशेष आहेत. अगदी दिसायलासुद्धा लाल, पिवळे आणि मिश्र रंगांचे दिसतात. हजारो वेळेस जाणवत होतं, की आम्ही जिथे होतो; ती एक अद्भुतच दुनिया होती...........

उष्ण पाण्याचा अनुभव घेतला. तिथे टेकडीवर समोर दिसणारं दृश्य फार मस्त होतं. मध्ये पठार व समोर उंचच उंच पर्वतरांग. दोन्हीच्या मध्ये नदी, नदीच्या आधी रस्ता, त्या रस्त्यावरून जाणारे सेनेचे महाकाय व मजबूत ट्रक्स........ सियाचेन नाही; पण त्याच्या जवळच्या पर्वतरांगा दिसत होत्या...... खार्दुंगलाच्या टोकाच्या उंचीवर आणि तिथून नंतर सरळ पाताळाच्या दरीत आल्यावर शब्द संपून गेले होते..... भावातीत, शब्दातीत, इंद्रियातीत........ भन्नाट, अचाट, सुसाट, विराट, अफाट..............


देखेंगे क्या है पर्वतों के पार...........







त्या टेकडीवरून दिसणा-या दृश्यामध्ये यथासांग डुंबलो... बरेचसे पर्यटक येऊन जात होते. अर्थात त्यातही मराठीच जास्त दिसत होते. भरपूर वेळ “त्या” विश्वात रमल्यावर परत निघालो. परत म्हणजे खालसरपर्यंत उलट येऊन तिथून दिस्कित व हुंदरकडे जाण्यासाठी...... नदीला लागून असलेल्या रस्त्यावर प्रवास सुरू होता....... वाटेत गावं व वस्ती अगदीच थोडी. वाटेत मैलाच्या दगडांवर मात्र सियाचेनच्या वीरांच्या खुणा दिसत होत्या..... भारावलेल्या अवस्थेत प्रवास सुरू होता. खालसरच्या आधी एक गोम्पा धावत्या भेटीत बघितली. विराट निसर्गापुढे माणसाचं अस्तित्व जाणवतंच नव्हतं.





खालसर येण्याच्या आधी आम्हांला हैदरभाईंनी नदीच्या पलीकडे एक वास्तू दाखवली. दिस्कितच्या रस्त्यावरची ती एक गोम्पा होती. दिसायला सरळच समोर दिसत होती; पण जायचा मार्ग खालसरवरून लांबवरून होता...... श्योक नदी........... शब्द नाहीत...............


सियाचेनचा मार्ग.................




वाळवंटातून जाणारा रस्ता!!

परत येताना खालसरमध्ये मराठी अधिकारी दिसले नाहीत. पुढे सरळ दिस्कितच्या मार्गाला लागलो. खालसरपासून दिस्कितकडे जाताना श्योक नदीचा मुख्य प्रवाह लागतो. अत्यंत विस्तृत असा प्रवाह आहे. फार मोठा होता. इतक्या पर्वतीय भागात इतका मोठा प्रवाह बघून आश्चर्य वाटलं. नदीमुळे आसपासचा प्रदेशही थोडा हिरवागार आणि वालुकामय झाला होता. काही ठिकाणी नदीच्या पात्रात वाळवंट होतं. रस्तासुद्धा अशाच एका वाळवंटातून जाऊन दिस्कितच्या बाजूच्या पर्वतरांगेस येऊन मिळतो. नदीचं विशाल पात्र व वाळवंट..... नक्कीच इथे भूतकाळात फार मोठा इतिहास घडला असला पाहिजे. हिमालयातील कितीतरी दुर्गम, अतिदुर्गम शिखरांमध्ये तिबेटी बौद्ध संस्कृतीचा प्रभाव दिसत होता.... ‘ला’ च्या रूपाने. अतिदुर्गम प्रदेशामध्ये पोचलेली बौद्ध संस्कृती किती गौरवशाली असेल आणि आहे.....


श्योक नदी पात्र व लगतची वाळू


वाळूजवळ असतात तसे दगडगोटे




करामत प्रतिबिंबाची....




निसर्गाचा कुंचला



नदीच्या पाण्यामध्ये पर्वताचं सुंदर प्रतिबिंब दिसत होतं..... पुढे दिस्कितच्या आधी एक विशाल गोम्पा आणि विशालकाय बुद्धमूर्ती होती. गोम्पा आणि त्यासोबत ब-याच मोठ्या वास्तु होत्या. पण त्या उंचीवर होत्या...... त्यामुळे फक्त गिरीशच त्या नीट पाहू शंकला.... दिस्कित गाव पुढे होतं.






दोघांच्या आकारावरून मूर्ती किती विशाल होती, ह्याचा अंदाज येऊ शकतो...





दिस्कित गाव लहानच आहे. तिथून सरळ पुढे हुंदर (किंवा हुंडर) हे गाव सात किमी अंतरावर लागतं. ह्या ठिकाणी आम्हांला अद्भुतामधला आणखी अद्भुत नजारा पाहायला मिळाला. दोन कुबड असलेल्या उंटांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. असं म्हणतात, की भारतावर सिकंदराने स्वारी केली; तेव्हा त्याच्या उंटांच्या काफिल्यातील काही उंट वाट चुकले. त्यांना दोन कुबड होते. त्याच उंटांचे हे वंशज आहेत, असं म्हंटलं जातं... उंटांव्यतिरिक्त तिथे जवळजवळ सर्व प्रकारचं दृश्य होतं. म्हणजे नदी होती, नदीच्या वाळूमुळे वाळवंट तयार झाला होता (कदाचित तिथे उंट असण्याचं हेच कारण असावं), जवळ पर्वत होते व दूर बर्फसुद्धा होता!!! एकाच वेळी अशा प्रकारचं दृश्य अन्य कुठे तरी दिसेल का? जगप्रवासामध्ये जितकं पाहायला मिळणार नाही; तितकं तिथे एकाच वेळी एका ठिकाणी दिसत होतं. अद्भुत नजारा.............


वाळवंट, पहाड, बर्फ आणि नदी.....


सुंदर हुंदर




दोन कुबडांचे उंट!!








खेळ मांडियेला वाळवंटी काठी........ हो, लदाखला बर्फाळ वाळवंट (कोल्ड डेझर्ट) असंही म्हणतात...






हे लदाखच आहे हो........






ह्या फोटोमध्ये काय काय दिसतं आणि काय दिसत नाही?

तोपर्यंत संध्याकाळ झालेली होती. हुंदर तसं अत्यंत छोटसं गाव. पण अद्भुत नजा-यामुळे पर्यटनस्थान म्हणून विशेष विकसित केलेलं वाटत होतं. सर्वत्र टापटीप व नीटनेटकेपणा दिसत होता. विदेशी पर्यटकांच्या झंझावाताचा हा एक चांगला परिणाम आहे. हैदरभाईंनी हॉटेल दाखवलं. तेही तिथेच मुक्काम करणार होते. तसंच श्रीनगर ते लेह आमच्यासोबत असलेले हसनजींचे सहकारीसुद्धा तिथे दुस-या पर्यटकांना घेऊन आले होते. हे हॉटेलसुद्धा अप्रतिम होतं; त्यामुळे घरच्यासारखं वाटत होतं.

प्रवासात हैदरभाईंसोबत गप्पा होत असताना अनेक गोष्टी कळल्या. सिव्हिलियन्सना जरी नियंत्रण रेषेलगतच्या भागात जायला परमिशन नसली; तरी ते सेनेच्या कामामुळे अनेकदा नियंत्रण रेषेजवळ गेले होते. अगदी बटालिकपासून चुशूल आणि सियाचेन बेसकँपपर्यंत. आनंदाने सांगत होते, की चुशूलमध्ये सूसू केली तर ती चीनमध्ये जाते..... नियंत्रण रेषा आणि सीमारेषा ह्यामधला फरक त्यांना कदाचित सांगता येणार नाही; पण देशभक्ती निश्चितच सच्ची होती. लदाख विभागामध्ये कुठेही फुटिरता आढळली नाही. उलट तिथले लोक भारताशी खूप घट्ट प्रकारे जोडले गेलेले आहेत.

ह्या सर्व प्रदेशाचा इतिहासही भूगोलाइतकाच रोमहर्षक आणि वेगळा आहे. प्राचीन सिल्क रूट (रेशीम व्यापार मार्ग) इथूनच जात होता. त्यामुळे हा भाग सर्वच दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. इथे त्यामुळे अनेक राज्ये, संस्कृत्या नांदल्या. हिंदु किंवा इस्लामी संस्कृतीपेक्षा अलीकडच्या काळात इथे बौद्ध संस्कृतीचाच प्रभाव आढळतो. नैसर्गिक व भौगोलिक आव्हानांना तोंड देऊन बौद्ध रितीरिवाज आजही ठामपणे उभे असल्याचं दिसतं. अर्थात एकूण संस्कृती कमालीची मिश्र आहे. बटालिकच्या उत्तरेला नियंत्रण रेषेलगत दहानू हे एक गाव असल्याचं कळालं. तिथे फक्त आर्यन समाजाचे लोक राहतात, असं कळलं. इतर समाजापेक्षा ते अत्यंत वेगळे दिसतात, असं कळालं. एकूणच लदाख व मध्य काश्मीर ह्या सर्व प्रदेशात कमालीची विविधता आहे आणि अजूनही प्राचीन संस्कृतीची मुळे घट्ट दिसतात.

दिस्कित, हुंदर व तुर्तुकपर्यंतचा प्रदेश आता पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. इथून भौगोलिक दृष्टीने करगिल जवळ आहे. पण सर्व रस्ता नियंत्रण रेषेलगत असल्यामुळे अद्याप प्रशासनाने तो खुला केलेला नाही. त्यामुळे तुर्तुक किंवा दिस्कितपासून करगिलला जायचं असेल, तर लांबवरून लेहमधूनच जावं लागतं. त्यामुळे जरी हा प्रदेश अद्भुत सौंदर्याचा असला तरी तो तितकाच कठिण आणि दुर्गम आहे. सामान्य माणसाचं आयुष्य खडतर नव्हे कमालीचं अवघड आहे.... सर्वच दृष्टीने. तरीसुद्धा इथे निर्मळ हास्य आणि साधेपणा उठून दिसतो.......


सियाचेन नाही, पण सियाचेनच्या उंबरठ्यावर आलो होतो........ इथून कन्याकुमारी व बीजिंग हे जवळजवळ सारख्याच अंतरावर होते..... १४ ऑगस्टची रात्र होती. दुस-या दिवशी स्वातंत्र्यदिन......

माझ्या मित्रांनी घेतलेले काही निवडक व्हिडिओज:

व्हिडिओ १

व्हिडिओ २

व्हिडिओ ३

व्हिडिओ ४

व्हिडिओ ५

व्हिडिओ ६

व्हिडिओ ७

व्हिडिओ ८

क्रमश:

पुढील भाग: दिस्कितच्या शाळेतला स्वातंत्र्य सोहळा