Saturday, June 9, 2012

जाऊया थोडे निसर्गाकडे

आपण निसर्गाच्या एकदम कुशीत जाऊ शकत नाही. सर्वच जणांना दरी- खो-यांमध्ये किंवा रानावनात फिरण्याचा आनंद घेता येऊ शकत नाही. परंतु शहरामध्ये पर्वती गांव सारख्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या परिसरात असूनही अगदी निसर्गाच्या जवळ गेल्यासारखा अनुभव पुण्यातील तळजाई टेकडी परिसरातील वनक्षेत्रात फिरताना नक्की येऊ शकतो...






मन शांत करणारे ठिकाण


जाऊ थोडे निसर्गाकडे



फिरण्यासाठी/ जॉगिंगसाठी उत्तम स्थान

ह्या परिसरात प्रचंड जैवविधता आणि अप्रतिम सृष्टीसौंदर्य आहे.


कोणत्याही ऋतूमधील अप्रतिम निसर्ग

कसे, कधी, का?सकाळी साधारण ५.३० ते ८ आणि संध्याकाळी ५ ते ७.३० हे सुरू असते. पुण्यात पर्वती गावातून पुढे टेकडीचा चढ सुरू होतो. प्रसिद्ध ठिकाण असल्यामुळे पुण्यात असूनही टेकडीचा पत्ता सांगितला जाईल, अशी अपेक्षा करता येऊ शकते.... टेकडीपर्यंत बस जात नाही; परंतु टेकडीचा चढ हासुद्धा रम्य परिसर आहे आणि कित्येक लोक तो पूर्ण चढ चढून नंतरही टेकडीवर फिरतात. टेकडीवर वनक्षेत्रात फिरण्याच्या कित्येक वाटा आहेत आणि सर्व परिसर अत्यंत नितांतसुंदर, शांत आणि रमणीय आहे. मनसोक्त चालल्यावर तिथेच नाश्त्याची सोयसुद्धा आहे. निसर्गापासून दूर राहणा-यांनाही निसर्गाच्या जवळ नेणारा हा एक सुंदर फेरफटका होऊ शकतो...


ही अप्रतिम प्रकाशचित्रं गिरीशने घेतली आहेत.



Sunday, May 27, 2012

लोब्संग राम्पा: एक महागाथा.........

स्वामी विवेकानंदांनी एका ठिकाणी स्वत:चं वर्णन “पाश्चात्य जगावर बाँबप्रमाणे कोसळलो,” असं केलं आहे. अगदी त्या धर्तीवर “पाश्चात्य आणि सर्व जगावर कोसळलेला एक महामानव,” असं लोब्संग राम्पा ह्यांचं वर्णन करता येईल. हा एक खराखुरा महापुरुष- श्रेष्ठ लामा आणि तिबेटी वीरपुरुष- गेल्या शतकात होऊन गेला. दुस-या महायुद्धाच्या काळखंडात त्याने असामान्य संघर्ष केला.... त्याचं एक पुस्तक हातात घेतलं. कधी पूर्ण झालं कळलंच नाही. मग दुसरं. मग तिसरं. त्या तीन पुस्तकांचं रसग्रहण आणि लोब्संग राम्पा कोण होता, ह्याचं आकलन करण्याचा हा एक प्रयत्न....



द थर्ड आय

द थर्ड आय म्हणजेच मराठीत भाषांतरित झालेलं ‘तृतीय नेत्र’ हे लोब्संग राम्पा (१९११- १९८१) ह्यांचं पहिलं पुस्तक. पुस्तकाची सुरुवात चार वर्षाच्या लोब्संगपासून होते. चार वर्षांचा लोब्संग घोड्यावर बसायला शिकत असतो आणि त्सूबाबा ह्या शिक्षकाकडून स्वसंरक्षण-कला शिकत असतो. तिबेटी प्रथेप्रमाणे सातव्या वाढदिवशी लोब्संगचं भविष्य वर्तवलं जातं. त्याचं भविष्य उज्ज्वल असतं, तो महान पद प्राप्त करणार असतो; परंतु त्याचं आयुष्य संघर्षमय असतं आणि त्याच्या आयुष्यात एक विशिष्ट ध्येय असतं. त्यानंतर लगेचच तो ल्हासा जवळच्या चाकपोरी आश्रमात दाखल होतो. तिबेटमधील उच्च दर्जाच्या निवडक आश्रमांपैकी हा एक आश्रम. आश्रमात प्रवेश घेण्यापासून त्याची खडतर परीक्षा सुरू होते. तीन दिवस त्याला आश्रमाच्या बाहेर एका स्थितीत अजिबात हालचाल न करता बसावं लागतं. ही आश्रमाची चाचणी असते! आणि त्यामध्ये तो उत्तीर्ण होतो. मग हळुहळु आश्रमाच्या पद्धती, गुरूजन, सहविद्यार्थी ह्यांची त्याला ओळख होते. त्याचे गुरू मिंग्यार डोंडूप लामाश्री त्याला घडवण्यास सुरुवात करतात. आधीपासून त्याची आध्यात्मिक उन्नती झालेली असल्यामुळे व ह्या जन्मात एका मोठ्या ध्येयाची पूर्तता हे त्याचं दायित्व असल्यामुळे त्याला इतरांपेक्षा खडतर प्रशिक्षण मिळतं. आश्रमातल्या कठोर वातावरणामध्ये तो पारंपारिक विद्यार्जन करतो.

एक वर्ष पूर्ण केल्यानंतर त्याची योग्यता एका पातळीवर पोचते. भावी जीवनातील कार्य पूर्ण करण्यासाठी डोंडूप लामाश्री व अन्य गुरूजन मिळून त्याच्या कपाळावर विशेष अशी शस्त्रक्रिया करतात व त्याचा तृतीय नेत्र जागृत करतात. तिबेटी मान्यतेनुसार प्राचीन काळी मानवामध्ये आज असाधारण वाटणा-या अनेक शक्ती होत्या आणि प्रत्येकाजवळ तिसरा डोळाही होता; पण काळाच्या ओघात जसं मानवाचं स्खलन झालं, तशा ह्या शक्ती संपत गेल्या. फक्त काही पुण्यवान आणि आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत व्यक्तीच त्या शक्तींसह जन्म घेऊ शकतात. आश्रमात लोब्संगचे जीवन-कार्य पूर्ण करण्यासाठी त्याच्या प्रशिक्षणाबरोबरच त्याच्या आध्यात्मिक शक्तींना सक्रिय करण्यात येतं आणि म्हणूनच त्याचा तिसरा डोळा सुरू केला जातो. कपाळावरचं ऑपरेशन झाल्यावर काही दिवस त्याला आराम करावा लागतो. शस्त्रक्रियेचं वर्णन, इतर संदर्भ आणि तपशील (उदा., डोळे बंद असल्यामुळे त्याला अंधा-या खोलीत ठेवलं, काही दिवसानंतर एक मंद पणती लावली, रोज तिची वात थोडी थोडी मोठी करत नेली व हळुहळु डोळ्यांना उजेडाची सवय केली) मूळातून वाचण्यासारखे आणि अत्यंत विस्मयजनक आहेत. तिस-या डोळ्यामुळे त्याला माणसांचे विचार व शारीरिक स्थिती उत्तम प्रकारे दिसते. तिबेटी आध्यात्मात सांगितलेला ऑरा- वलय त्याला दिसतात. प्रत्येक माणसाच्या वलयाच्या रंगावरून आणि स्थितीवरून त्याची मन:स्थिती, विचार, शारीरिक स्थिती ह्या गोष्टी त्याला समजू लागतात. ह्या सर्व वर्णात तिबेटी आध्यात्मिक प्रगती, तिबेटी संस्कृती ह्यावर प्रकाश टाकला गेला आहे. आणि अनेक गोष्टी चमत्कारिक व विस्मयजनक असल्या तरी त्या सुसंबद्ध आहेत.

चाकपोरी आश्रमात डोंडूप लामाश्रींच्या हातांखाली लोब्संगचं प्रशिक्षण पुढेही सुरू राहतं. त्याला लामापद प्राप्त होतं. तिबेटी वैद्यकशास्त्र, शल्यक्रिया आदिमध्ये तो पारंगत होतो. आश्रमामध्ये दर वर्षी दुर्मिळ वनौषधींसाठीच्या सहलीचा एक कार्यक्रम असतो. त्यात तो भाग घेतो. दूरवरच्या आणि ल्हासापेक्षाही अधिक उंचीवर असलेल्या प्रदेशात जाऊन तो वनौषधी आणण्याच्या मोहिमेत सहभागी होतो. तिबेटमधील पतंग उडवण्याच्या पद्धतीचंही वर्णन छान आहे. हे पतंग म्हणजे ग्लायडरसारखे मोठे असतात. त्यातून उंच डोंगरावर काही लोक थोडा वेळ हवाई भ्रमण करू शकतात. तिबेटी गुरूकुल पद्धती, आध्यात्मिक परंपरा, जीवनपद्धती ह्यांचं वर्णन सुंदर आहे.

ल्हासामधील तेरावे दलाई लामा डोंडूप लामाश्रींचे मित्र असतात आणि लोब्संगवरही त्यांचा जीव असतो. लोब्संगच्या तिस-या नेत्राचं काम इथे सुरू होतं. दलाई लामांना भेटायला विविध लोक- राजकीय पाहुणे येत असतात. ह्या पाहुण्यांचे उद्देश नक्की कसे आहेत, त्यांचे अंत:स्थ विचार काय आहेत, हे त्यांना लोब्संगकडून काढून घ्यायचं असतं. दलाई लामा लोब्संगवर प्रसन्न होतात. ल्हासाच्या पोताला आश्रमाचं वर्णन दिलं आहे. एकदा डोंडूप लामाश्री व लोब्संग आश्रमाच्या सर्वसामान्यांना प्रतिबंधित असलेल्या आणि फक्त उच्च लामांना खुल्या असलेल्या जमिनीखालच्या भागात जातात. तिबेटी परंपरेतील वैभवशाली वास्तु, पुरातन ग्रंथ, आध्यात्मिक साधनं इत्यादि तिथे असतात. आणखी गूढ अशाही ब-याच गोष्टी असतात.

त्यानंतर वनौषधी आणण्यासाठी तिबेटच्या एका अतिदुर्गम प्रदेशातील थरारक मोहिमेचं वर्णन दिलं आहे. तिबेटच्या उत्तर- पश्चिम भागामधील चांग- तांग ह्या पर्वतीय प्रदेशात डोंडूप लामाश्रींच्या नेतृत्वाखाली एक मोहिम जायला निघते. कित्येक महिने चालणा-या ह्या मोहिमेसाठी भरपूर सामग्री, घोडे, तट्टं इत्यादी तयारी केली जाते. तिबेटचा हा अतिदुर्गम भाग असतो. ल्हासा व आसपासच्या प्रदेशाची उंची ४००० ते ५००० मीटर आहे; पण चांग तांग ह्या उत्तर पश्चिम तिबेटमधील भागाची उंची ७००० ते ८००० मीटर असते आणि प्रवास पूर्णत: अशक्यप्राय असतो. बर्फाचे डोंगर, द-या, रस्त्यांचा अभाव, प्रतिकूल वातावरण, संपूर्ण निर्मनुष्य अशा सर्व परिस्थितीत मोहीम सुरू राहते. कित्येक साथीदार व घोडे आजारी पडतात. त्यांना वाटेतल्या एका शेवटच्या मुक्काम करण्यायोग्य ठिकाणी ठेवून उरलेले लोक पुढे जातात. खडतर प्रवास सुरूच राहतो. सर्व जण गळून जातात. सर्वांचे हाल होतात. तेव्हा कुठे चांग- तांग पर्वतीय प्रदेशात ते पोचतात. तिथलं हवामान सुखद व आल्हाददायक असतं. वनौषधींचा शोध घेता घेता त्यांना एक अतिप्राचीन नगरी सापडते. परत असाच खडतर प्रवास करत करत कित्येक महिन्यांनी ते मानवी प्रदेशात येतात. प्रवासाचे तपशील वाचण्यासारखे आहेत. वर्णन असामान्य असलं तरी अतिरंजित आणि अतिरेकी नाही. आपण नकाशात पाहिलं तर चांग तांग हा भाग आपल्याला तिबेटच्या वायव्य सीमेजवळ अक्साई चीनच्या दक्षिणेला आणि लदाखच्या पूर्वेला दिसतो........ अद्भुत...... असंच हे वर्णन आहे.

दहा वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर लोब्संगचं तिबेटमधलं शिक्षण पूर्ण होतं आणि वयाच्या अठराव्या वर्षी तो वरिष्ठ लामा होतो (सुमारे १९२९). जीवन-कार्य पूर्ण करण्यासाठी त्याला अधिक शिक्षणाची गरज असते; म्हणून तो तिबेट सोडतो. चीनच्या मध्यभागात असलेल्या चुंगकिंग (आजचे Chongqing) ह्या शहरात जाण्यासाठी तो निघतो. घर, आई- वडील ह्यांची त्याची आधीच ताटातूट झालेली असते. आणि तिबेटमध्ये आगामी येणा-या संकटांच्या संदर्भात भावी आयुष्यातल्या आव्हानास सामोरे जाण्यासाठी चुंगकिंगला जायला निघताना लोब्संगची गुरूजी, आदरणीय दलाई लामा व मातृभूमी तिबेट ह्यांचीही ताटातूट होते आणि इथेच ‘द थर्ड आय’ हे पुस्तक समाप्त होतं.......................



डॉक्टर फ्रॉम ल्हासा

मराठीतलं तृतीय नेत्र वाचून झाल्यावर विलक्षण कुतूहल निर्माण झालं. इंटरनेटवर थोडं सर्च केलं आणि लगेच लोब्संग राम्पा ह्याच्या विषयी भरपूर माहिती मिळाली आणि त्याची पुस्तकंही डाऊनलोड करून वाचता आली! त्यामुळे लोब्संग राम्पाच्या जीवनयात्रेची महागाथा पुढे वाचता आली! डॉक्टर फ्रॉम ल्हासा हे त्यांचं दुसरं पुस्तक. ‘द थर्ड आय’ जिथे संपतं, तिथून हे पुस्तक सुरू होतं. निवडक साथीदार आणि तंदुरुस्त घोड्यांसोबत लोब्संगचा प्रवास चुंगकिंगच्या दिशेने सुरू होतो.... प्रवासवर्णन, जीवनशैली, तिबेटची माहिती ह्यांचं अत्यंत सुंदर मिश्रण ह्यात आहे. तिबेट हा अतिउंचीवरील प्रदेश. सरासरी उंची चार हजार मीटर आणि विलक्षण थंड हवामान. त्यामुळे जसे ते अतिउंचीवरून कमी उंचीच्या प्रदेशात येतात, तशा त्यांना अडचणी येतात. शरीराला कमी उंचीच्या वातावरणाची सवयच नसते. त्यामुळे उष्ण हवामान, जास्त घनतेची हवा ह्याचा त्यांना खूप त्रास होतो. तोपर्यंत चिनी संस्कृतीही सुरू झालेली असते. सर्व बदलांचा त्रास होतो. तरीही त्यांचा प्रवास सुरू राहतो. रात्री वाटेत लागणा-या एखाद्या मठात मुक्काम करत प्रवास सुरू राहतो. आणि हे मठ दलाई लामांच्याच परंपरेतलेच असे नसतात. परंतु कोणत्याही विचारधारेचा मठ असला, तरी यात्रेकरूंची व्यवस्था केली जाते! उष्ण प्रदेश, दमट हवामान, वादळी वारे ह्यांचा सामना करत करत ते पुढे जातात. एका टप्प्यावर आल्यावर त्यांना पक्का रस्ता लागतो आणि तिथून चार चाकांच्या वाहनांची वाहतुक सुरू होते! नवीन जगच सुरू होतं.

यांगत्सेच्या किनारी असलेलं चुंगकिंग हे तत्कालीन चीनमधलं एक मुख्य ज्ञानकेंद्र व बाजारपेठ असते. लोब्संग शहरी जीवन, काही प्रमाणात पाश्चात्य प्रभाव पहिल्यांदाच बघतो. तिथल्या एका वैद्यकशास्त्र महाविद्यालयात तो प्रवेश घेतो. त्याचे गुरूजी व दलाई लामांच्या ओळखीमुळे त्याची व्यवस्था होते. वैद्यक शास्त्रातलं त्याचं ज्ञान तपासलं जातं. त्याचं कठोर प्रशिक्षण व ज्ञान ह्यामुळे त्याचं ज्ञान अर्थातच भरपूर असतं. फक्त मॅग्नेटिझम आणि इलेक्ट्रिसिटी हे दोन विषय त्याला पूर्णपणे नवीन असतात! आणि इथेच गमती- जमती होतात! इलेक्ट्रिक करंट शिकवतानाच्या प्रात्यक्षिकामध्ये ‘करंट’ काय असतो, ह्याचं प्रात्यक्षिक दाखवताना विद्यार्थ्यांना छोटा शॉक देऊन करंट म्हणजे काय, हे शिकवलं जातं. परंतु आध्यात्मिक साधनेमुळे लोब्संगला करंटची जाणीवच होत नाही (फक्त किंचित उष्णता जाणवते). काही तरी गडबड झाली, असं बघून शिक्षक जेव्हा स्वत: हात लावतात, तेव्हा त्यांना मात्र मोठा धक्का बसतो!! असंच मॅग्नेटिझमच्या प्रात्यक्षिकामध्ये होतं. लोब्संगला तिस-या डोळ्यामुळे चुंबकीय क्षेत्र दिसत असतं आणि हेच त्याच्या शिक्षकांना कोड्यात टाकतं. ह्या चिनी महाविद्यालयात अमेरिकन पद्धतीने वैद्यकशास्त्र शिकवलं जात असतं. तिबेटी पद्धत व पारंपारिक ज्ञान व अमेरिकन ज्ञान ह्यांच्यासंदर्भात वर्णन छान आहे. पाश्चात्य उथळ ज्ञानापेक्षा पौर्वात्य ज्ञानात जास्त शहाणपणा व खोली आहे, असं लोब्संगचं मत असतं. अनेकदा त्रास देणा-या आडदांड लोकांना लोब्संग मानेतली एक नस दाबून एका क्षणात लोळवतो. त्याचं आधुनिक वैद्यकशास्त्राचं शिक्षण सुरू राहतं.

योगायोगाने त्याची ओळख एका चिनी पायलटशी होते. हळुहळु उत्सुकतेपोटी तो त्यांच्याकडून विमान उडवण्याचं तंत्र शिकून घेतो आणि एकदा चक्क विमान उडवतो! त्याचं कौशल्य पाहून चैंग- कै- शेकचे लोक त्याला चिनी विमानदळात घेऊ इच्छितात. परंतु ह्यावेळीच अनेक दुर्घटनांना सुरुवात होते. चुंगकिंगमधले लोब्संगचे एक ओळखीचे लामा प्राणत्याग करतात. त्याचवेळी त्याला त्याचे गुरूजी- डोंडूप लामाश्री ह्यांनीही प्राणत्याग केल्याचं कळतं. तो न राहवून शोक करायला लागतो. त्याचा शोक पाहून डोंडूप लामाश्री सूक्ष्म देहाने येऊन त्याचं सांत्वन करतात आणि त्याला पुढच्या खडतर प्रसंगांना सामोरं जाण्यास सांगतात. त्यातून तो सावरला नसतानाच बातमी येते की आदरणीय दलाई लामा लवकरच शरीर सोडणार आहेत. त्याला आणि आणखी एका लामाला ल्हासाला येण्यासाठी मानसिक दूरसंवेदन- टेलिपॅथी पद्धतीने निरोप दिला जातो. एक वरिष्ठ लामा असूनही भावना आवरणं त्याला जड जातं. सत्वर तो ल्हासाला यायला निघतो. ह्यावेळी मात्र त्याच्यासाठी अर्ध्या वाटेपर्यंत (जिथे रस्ता जाऊ शकतो तिथपर्यंत!) एका मजबूत अमेरिकन गाडीची व्यवस्था केली जाते. ही गाडी दिवसरात्र प्रवास करून त्याला अर्ध्या वाटेवर रस्ता संपतो तिथे असलेल्या एका मठात आणून सोडते. ह्या मठातल्या मठाध्यक्षालासुद्धा टेलिपॅथी संदेश आलेला असल्यामुळे त्याने एक मजबूत घोडा लोब्संगसाठी तयार ठेवलेला असतो!

लोब्संग ल्हासामध्ये गुरूजी व आदरणीय दलाई लामांच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित राहून आणि सहाध्यायी, मित्र आदिंचा अखेरचा निरोप घेतो. तिबेटी पद्धतीप्रमाणे दलाई लामांचा मृतदेह विशेष प्रकारे जतन करून पवित्र वास्तूत ठेवला जातो. विशेष म्हणजे त्यांचं मस्तक वारंवार पूर्वेकडे वळतं!! ह्याचं कारण म्हणजे पूर्वेकडून येणा-या (चिनी आक्रमणाच्या) संकटाबद्दल ते अखंड सावधानतेचा इशारा देत असतात. लोब्संग ल्हासाला अखेरचा रामराम करून तो चुंगकिंगच्या दिशेने घोड्यावरून सुसाट निघतो. मुक्कामाच्या मठामध्ये नवीन घोडा घेऊन तो न थांबता प्रवास करतो. परत त्याला तीच मजबूत गाडी मिळते आणि अखेरिस तो चुंगकिंगला येऊन पोचतो.

त्या वेळी चुंगकिंगमध्ये हळुहळु जपानी आक्रमणाच्या बातम्या येत असतात. अनेक भागांमध्ये जपानी कारवाया सुरू झालेल्या असतात. त्याला चैंग-कै शेकच्या अधिका-यांचा निरोप मिळतो. तो चिनी विमानदलात एक वैद्यकीय अधिकारी म्हणून दाखल होतो! आक्रमणाच्या तणावामुळे शांघायजवळ परिस्थिती बिघडत असते व तिथल्या वैद्यकीय सेवेसाठी तो शांघायला येतो. काही काळाने म्हणजे ७ जुलै १९३७ रोजी मार्को पोलो पूल ओलांडून जपानी सेना शांघायवर हल्ला करते. ‘डॉक्टर फ्रॉम ल्हासा’मधला इथून पुढचा भाग म्हणजे खरीखुरी युद्धकथाच आहे. विपरित परिस्थितीमध्ये आणि कोणत्याही साधनांशिवाय रुग्णसेवा करत असताना जपानी लोक लोब्संगला पकडतात. त्याचे असंख्य हाल करतात. त्याने प्रश्नांची उत्तरं द्यावीत म्हणून अत्यंत क्रूर हाल करतात. उलटे टांगून हात गळ्याशी बांधणे, नखं कापून त्यात मीठ चोळणे, उपाशी ठेवणे, आगीवर टांगून ठेवणे आणि असंख्य. कित्येक दिवस, आठवडे व महिने ते त्याचा छळ करतात, पण तो “मी चिनी सेनेत अधिकारी आहे व युद्धकैदी आहे,” ह्याव्यतिरिक्त काहीच सांगत नाही. प्रचंड अत्याचार सहन केल्यानंतर तो कसाबसा तुरुंगवासातून मृतदेहाचं सोंग घेऊन निसटतो आणि एका वृद्ध चिनी माणसाच्या मदतीने परत चैंग- कै- शेकच्या चिनी सैन्याला मिळतो. काही दिवस चुंगकिंगमध्ये राहतो. त्यावेळी चीनच्या मध्यवर्ती भागात असलेल्या चुंगकिंगचीही रया गेलेली असते. तिथेही हल्ले सुरू झालेले असतात. थोडा आराम करून व जुन्या लोकांना भेटून तो परत युद्धभूमीवर येतो. रुग्णसेवा करत असतानाच परत पकडला जातो. पुन: भयानक छळ आणि हाल. परत एकदा तो निसटतो आणि एका युरोपीयन व्यक्तीच्या घरी जातो. पण तो जपानी लोकांना सामील झालेला असल्यामुळे लोब्संग परत एकदा जपानी लोकांच्या तावडीत सापडतो. सर्वत्र जपानच्या विजयाच्या बातम्या येत असतात.

लोब्संग माहिती देत नसल्यामुळे ते त्याचा अविरत छळ करतात. पण कठोर परिश्रम आणि आध्यात्मिक प्रगतीच्या बळावर लोब्संग टिकाव धरतो. छळामुळे होणा-या वेदनांचा सामना करण्यासाठी त्याला वेदनांवरून मनाचं ध्यान दूर न्यायचं असतं. त्यासाठी तो जुन्या आठवणी, गुरूंचे उपदेश व गतकालीन प्रसंग आठवतो. चांग- तांग पर्वतीय प्रदेशातील त्यांचा प्रवास, प्राचीन नगरी, तिथली उपकरणे, तिथे दिसलेले यती इत्यादी त्याला आठवतात. मधून मधून गुरू सूक्ष्म रूपाने येऊन त्याला प्रेरणा देतात. शेवटी त्याला एका महिला कैद्यांच्या कँपचा डॉक्टर म्हणून काम देतात. त्या भागात मिळणा-या वनस्पतींचा वापर कुशलतेने करून तो ट्रॉपिकल अल्सरसारख्या भितीदायक रोगावर औषधोपचार तयार करतो. कैद्यांना गोळा करून साधनं तयार करतो. श्वासाचा परिणामकारक वापर करून वेदना कशा कमी जाणवतील, ह्यासाठी कैद्यांना प्रशिक्षण देतो. परंतु काही दिवसांतच त्याला पुन: बंदी करून जपानमधल्या तुरुंगात आणलं जातं. शांघायहून जवळजवळ एक मृतदेह म्हणून जपानच्या मुख्यभूमीपर्यंतच्या प्रवासाचं केलेलं वर्णन थरारक आणि भीषण आहे. युद्ध आणि साम्राज्यवाद असेल, तर नाव कोणतंही असो, वास्तव सैतानाचा साक्षात्कार, हेच असतं हे दिसतं.....

जपानच्या मुख्यभुमीतील हिरोशिमाजवळच्या एका बंदिवासात लोब्संगला ठेवण्यात येतं. सततच्या छळामुळे व शरिरावर झालेल्या असंख्य आघातांमुळे तो अत्यंत अशक्त असतो आणि कित्येक दिवस पडून असतं. त्याचं स्थळ- काळाचं भान शिल्लक राहात नाही. फक्त ह्या तुरुंगात समुद्रातून कोणत्या मार्गाने आलो, तितकं त्याला लक्षात असतं. लोब्संग कमालीचा अशक्त असतो. अशक्त लोब्संगच्या सूक्ष्म देहाला उच्च लोकामध्ये बोलावलं जातं. तिथे लोब्संगला त्याचे गुरुजी व अन्य लामा भेटतात. ते त्याला सांगतात, “तू अत्यंत कष्टप्रद परिस्थितीतून जात आहेस. तुझ्या कष्टांना व हाल- अपेष्टांना मर्यादा नाहीत. तुझं शरीर खिळखिळं झालं आहे. आम्ही तुला मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून आम्ही असा एक ब्रिटिश नागरिक बघितला आहे, जो प्राणत्याग करू इच्छितो. त्याचं शरीर तुला मिळू शकतं. पण अजून त्यासाठी सात वर्षं बाकी आहेत. तुला हर हवं असेल, तर तू शरीर सोडून आमच्यात येऊ शकतो; तुला कोणीही नाव ठेवणार नाही.” त्यावर लोब्संग त्याच्या विशेष ध्येयासाठी झुंजत राहण्याची इच्छा व त्याचा निर्धार बोलून दाखवतो. सूक्ष्म देह परत त्याच्या शरिरात येतो आणि त्याचा तुरुंगवास सुरू राहतो.

एके दिवशी लोब्संगला विमानाची घरघर ऐकू येते. त्याला माहिती असलेल्या विमानांपेक्षा ती वेगळी असते. तेवढ्यात बाहेर सर्वत्र हल्लकल्लोळ उठतो आणि सैनिक आरडाओरड सुरू करतात. सर्वत्र एकच थैमान सुरू होतं. “सम्राट, आम्हांला ह्या प्रलयापासून वाचवा,” असं सैनिक म्हणत असतात. लोब्संगने लिहिलं आहे, की तो हिरोशिमावरचा ६ ऑगस्ट १९४५ चा अणुबाँब होता आणि अर्थातच हे त्याला त्या वेळी समजलं नाही.. लोब्संगला जाणवतं की सर्व सैनिक प्रचंड भितीने पळत आहेत आणि त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही. तो इतका अशक्त असतो, की त्याच्या खोलीला कुलुपही नसतं. तो हळुच बाहेर पडतो. एका सैनिकाचे बूट व पोशाख घेऊन खुरडत खुरडत समुद्राच्या दिशेने पुढे जायला निघतो. कसा बसा तो किना-यावर पोचतो. सर्वत्र अराजकता असते, त्यामुळे त्याला कोणी अडवत नाही. वाळूत त्याला एक नाव दिसते. शक्ती एकवटून तो नावेपर्यंत जातो. त्यात त्याला काही मासे अन्न म्हणून ठेवलेले दिसतात. तो थोडेसे खातो आणि खूप जोर लावून नावेचा दोर तोडतो. नाव मोकळी होते आणि हळुहळु समुद्रात जाते......... असंख्य मरणयातना आणि अत्याचार सहन केल्यावर कित्येक वर्षांच्या तुरुंगवासातून तो मुक्त होतो........ आणि तिथेच ‘डॉक्टर फ्रॉम ल्हासा’ भाग संपतो.



द राम्पा स्टोरी

आत्मचरित्राच्या ह्या तिस-या भागाच्या सुरुवातीला वर्तमानकाळातील काही संवाद आहेत. पण ते समोरासमोरचे किंवा दूरध्वनीवरचे नाहीत; तर सूक्ष्म रूपातील आहेत!! पहिले दोन भाग प्रकाशित झाल्यावर लोब्संगवर काही लोकांनी खूप टीका केलेली असते. खोटं आणि काल्पनिक लेखन असं त्याच्या लेखनाबद्दल बोललं जात असतं. त्याला त्याचे गुरूजी व अन्य लामा समजावून सांगतात, की त्याने लिहिणं खूप आवश्यक आहे. जे लोक आध्यात्मिक प्रवासात थोड्या तरी विकसित अवस्थेत आहेत, ते त्याचं सांगणं समजू शकतील. आणि इतरांनी जरी त्याच्या सांगण्याला खोटं म्हंटलं, तरी त्यांच्या अंतर्मनात त्याची नोंद होईल व योग्यवेळी त्यांनाही त्याची जाणीव होईल. म्हणून ते त्याला लिहिण्यास प्रेरित करतात. आधीच्या भागांकडे एक दृष्टीक्षेप टाकल्यावर आत्मचरित्र परत हिरोशिमामध्ये व तिथून बाहेर पडणा-या नावेच्या प्रवासाकडे येतं.....

कितीतरी दिवस, आठवडे, महिने लोब्संगची नाव समुद्रात जात राहते. त्याला स्थळ- काळाचं भान उरत नाही. नावेतले मासे आणि पावसाचं पाणी ह्यावर मधून मधून जागा होणारा लोब्संग पुढे पुढे जात राहतो....... कित्येक काळ उलटल्यावर त्याच्या कानावर काही शब्द ऐकू येतात. त्याची नाव किना-याला लागलेली असते आणि दोन तरुण किना-यावरून त्याच्याकडे येतात. ते त्याला ढकलून नाव स्वत:च्या ताब्यात घेतात. लोब्संग किना-यावर वाळूत बेशुद्ध पडलेला असतो.

शुद्धीवर आल्यावर लोब्संगला त्याला एका जागी आडवं केल्याचं दिसतं. त्याच्याजवळ पाणी व थोडं अन्न ठेवलेलं असतं. तो एका मठात असतो. त्याचे उघडलेले डोळे पाहून एक वृद्ध बौद्ध भिक्षु त्याच्याकडे येतात. दोघांची भाषा चिनी असली तरी त्यात बराच फरक असतो; पण हळुहळु संवाद सुरू होतो. ते भिक्षु त्याला सांगतात की ते वाळूत त्याला बघून शिष्यांना सांगून मठात आणतात. ते हेही सांगतात, की त्यांच्या मठात एक दिवस कोणी विशेष अतिथी येणार आहे, अशी त्यांना पूर्वीपासून सूचना देण्यात आली होती व केवळ त्या कारणासाठी ते वयोवृद्ध भिक्षु शेवटचा श्वास घेत जगत असतात. काही दिवस लोब्संग तिथे विश्रांती घेतो. परंतु नंतर ते भिक्षु त्याला समजावतात की त्याने फार काळ थांबून चालणार नाही, कारण धोका अजून संपलेला नाही आणि भिक्षुही राहणार नाहीत. तो मठ उत्तर कोरियामध्ये असतो (अर्थातच लोब्संगची नाव जपानच्या दक्षिण- पश्चिमेकडून समुद्र ओलांडून उत्तर कोरियाला लागलेली असते!!!). भिक्षुंचे शिष्य त्याला उनगीचा रस्ता सांगतात. उनगी उत्तर कोरियामध्ये रशियन सीमेपासून जवळ असतं (गावाचं आजचं नाव सोन्बोंग आहे आणि ते उत्तर कोरियामध्ये चीन व रशिया ह्यांच्या सीमेलगत आहे). मुख्य रस्त्यावरून न जाता बाजूने चालत चालत तो तिथपर्यंत जातो. चिनी आणि जपानी भाषेत लोकांना विचारत विचारत आणि थांबत थांबत जातो. उनगीमध्ये पोचल्यावर त्याला व्हॅलिडिओस्टॉककडे जायचं असतं. त्याला रशियन लाल फ्रंटियर पेट्रोलचे तीन सैनिक दिसतात. त्यांच्याजवळ पोलिसी कुत्रे असतात. त्याला बघून ते कुत्रे त्याच्यावर धावून येतात.... लोब्संग मनामध्ये त्या कुत्र्यांप्रति सद्भाव व्यक्त करून तो त्यांचा मित्र आहे, असा विचार व्यक्त करतो. कुत्रे त्याच्या अंगापर्यंत येऊन शांत होतात. सैनिकांना प्रचंड आश्चर्य वाटतं. ज्या अर्थी कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला नाही, त्या अर्थी तो स्थानिक धर्मगुरू असावा, असं त्यांना वाटतं. ते प्रभावित होऊन त्याची मदत करतात. त्याला त्यांच्या गाडीतून व्हॅलिडिओस्टॉकलाही न्यायला तयार होतात.

व्हॅलिडिओस्टॉकमधल्या छावणीमध्ये पोलिसी कुत्र्यांनी वेगळीच समस्या निर्माण केलेली असते. कारण कम्युनिस्ट लाल सोव्हिएत राजवटीमध्ये सैनिक त्या कुत्र्यांना सतत बंडखोरांवर सोडत असतात व त्यामुळे मानवी रक्ताची चटक लागून ते कुत्रे नियंत्रणाबाहेर जात असतात. कुत्र्यांच्या एका दंगलीमध्ये 4 सैनिकसुद्धा ठार झालेले असतात. म्हणून हे सैनिक (त्यातला एक सार्जंट असतो) लोब्संगला कुत्र्यांना नियंत्रणात आणायला सांगतात. तो आणून दाखवतो. मग आणखी कुत्र्यांना नियंत्रणात आणण्याचा ‘पराक्रम’ लोब्संग करतो. त्याच्यामुळे तिथला वरिष्ठ अधिकारी इतका प्रभावित होतो, की त्याला लाल सोव्हिएत सेनेत तो त्याला मानाचं कॉर्पोरेल पद देतो! काही दिवस कुत्र्यांच्या प्रशिक्षणासाठी ते लोब्संगला थांबवून घेतात, पैसे आणि इतर साधनं देतात. लोब्संग त्यांच्याकडून व्हॅलिडिओस्टॉकमधून मॉस्कोला जाणा-या ट्रान्स सैबेरियन रेल्वेच्या प्रवासाची माहिती काढून घेतो. सुरक्षा रक्षकांना चुकवत तो प्रवास कसा करता येईल, हे त्याच्या लक्षात येतं.......

तिथून पुढे त्याचा अखंड प्रवास सुरू होतो...... प्रवास, छळ आणि परत प्रवास. व्हॅलिडिओस्टॉकच्या पुढच्या एका गावात तो मॉस्कोला जाणा-या मालगाडीमध्ये बसतो. पुढे काही दिवसांनी बैकल सरोवराजवळ ती गाडी थांबते. तपासणीच्या वेळी तो ट्रेनमध्ये उतरून मग परत डब्यात चढतो. पण ह्यावेळी डब्यात अजून चार जण असतात. ते त्याच्यावर हल्ला करतात. पण तिबेटी युद्धकौशल्याने लोब्संग त्यांना लगेचच शांत करतो. मग ते त्याला सहकार्य करतात. मालगाडीमध्ये खायला धान्य व पदार्थ मिळतात. सैबेरियातल्या बर्फापासून पाणी मिळतं. निघाल्यापासून जवळजवळ चोवीस दिवसांनी लोब्संग मॉस्कोजवळ पोचतो. तिथून परत प्रवास, कैद, छळ, सुटका, प्रवास असं किती तरी महिने किंवा वर्षं सुरू राहतं. अखेरीस तो युक्रेन- पोलंडमार्गे चेकोस्लोव्हाकियामध्ये पोचतो (दुस-या महायुद्धातल्या जवळजवळ सर्व महत्त्वपूर्ण युद्धक्षेत्रातून जाऊन!). तिथून मग त्याचा छळ थोडा थोडा कमी होतो. परंतु पाश्चात्य जगातील पद्धती माहित नसल्यामुळे लोक त्याला फसवत राहतात. तरीही स्वत:च्या हुशारीवर असंख्य उद्योग करत तो चेकोस्लोव्हाकिया, इटली, जर्मनी, फ्रांसमार्गे अमेरिकेत पोचतो. ह्या सर्व प्रवासात ड्रायव्हर, इंजिनिअर, मर्चंट नेव्ही इंजिनिअर, रेडिओ निवेदक अशी कित्येक कामं तो करतो.

मधल्या कालावधीत तिबेटमध्ये चीनच्या लाल सेनेने आक्रमण करून तो देश गिळंकृत केलेला असतो (१९५०). सर्वत्र पारतंत्र्य आणि जुलुमशाही आलेली असते. ल्हासामधले मठ जाऊन तिथे नवीन कामगारगृहे येतात. सूक्ष्म रूपात लोब्संग हे पाहतो. सूक्ष्म रूपात त्याचं त्याच्या गुरुजींशी संभाषण होतं. ते त्याला सांगतात, की त्याच्या शरीराचा मृत्यू जवळ आला आहे आणि त्याने आता तिबेटमध्ये जाऊन आत्मार्पण करावं, म्हणजे त्याचं शरीर पारंपारिक पद्धतीने जतन करता येईल आणि एका ब्रिटिश नागरिकाच्या शरीरात जाऊन तो त्याचं जीवितकार्य करू शकेल. त्या लामांनी त्या ब्रिटिश नागरिकाशीही संभाषण केलेलं असतं. त्यानुसार तो भारतात मुंबईला येतो आणि तिबेटच्या सीमेवर पोचतो. ल्हासामध्ये शत्रूसैन्य असल्यामुळे तो तिथे जाऊ शकत नाही; परंतु एका दुर्गम पहाडावरच्या मठामध्ये शरीरत्याग करतो. सूक्ष्म रूपात अन्य लामा त्याला सहकार्य करतात व बराच प्रयत्न केल्यावर तो ब्रिटिश नागरिकाच्या शरीरामध्ये शिरतो. तिथून मग त्याचं सुरुवातीला इंग्लंड, नंतर आयर्लंड आणि शेवटी कॅनडामध्ये नवीन आयुष्य सुरू होतं. अनेक छोटीमोठी कामं केल्यावर तो शेवटी लेखक बनतो. आणि ‘द थर्ड आय’ लिहून त्याची लेखन कारकीर्द सुरू होते!! परंतु त्याचं जीवितकार्य मानवतेच्या मुक्तीसाठी शरीराभोवतीच्या वलयांवर (ऑरा) संशोधन करून रोगनिदान करण्यामध्ये सहाय्य करेल, असे उपकरण विकसित करणे, हे असतं. त्याशिवाय पारंपारिक तिबेटी बौद्ध ज्ञानाची तो जगाला ओळख करून देतो. स्वत:च्या अनुभवाद्वारे आणि मिळालेल्या ज्ञानाद्वारे मानवजातीच्या इतिहासाची नव्याने ओळख करून देतो आणि एक प्रकारे पारंपारिक ज्ञानाला नष्ट होण्यापासून वाचवतो.........

समारोप

अशी ही तीन पुस्तकांची रोमहर्षक मालिका आणि असा हा दिव्य लोब्संग राम्पा! त्याने ह्या तीन आत्मचरित्रात्मक पुस्तकांनंतर वैचारिक अशी बरीच पुस्तकं लिहिली. जागतिक तत्त्वज्ञानात त्याने उत्पन्न केलेली लाट अजूनही शांत झालेली नाही....

लोब्संग राम्पाच्या लेखनाला आणि विचारांना नेहमीच कठोर टीका सहन करावी लागली. फेक, खोटारडा म्हणून खूप लोकांनी त्याला बघितलं. पण त्याच्या सांगण्यात अर्थ आहे, असे मानणारेही कमी नाहीत. पाश्चात्य विज्ञान व मानसिकतेबद्दल त्याची मतं कठोर आणि रोखठोक आहेत. पाश्चात्य मानसिकता कमालीची स्वार्थी, स्व- केंद्रित आणि दुस-यांचे शोषण करणारी आहे, असं तो सांगतो. पाश्चात्य मानसिकतेला प्रत्येक गोष्ट प्रयोगशाळेत आणून त्याचे तुकडे तुकडे करून सूक्ष्मदर्शकाखाली त्यांचं निरीक्षण करेपर्यंत काहीही पटणार नाही, हे तो सांगतो. निव्वळ आसुरी इच्छा करण्याऐवजी पाश्चात्य मानसिकतेने जर थोडा विनम्रभाव आणि खुली मानसिकता ठेवली, तर त्यांचं भलं होईल, असं सांगायला तो कमी करत नाही.

ह्या तीनही पुस्तकांमध्ये निव्वळ आत्मकथन नाही. त्यामध्ये भरपूर विचारमंथन आहे, सोप्या उदाहरणांसह अनेक आध्यात्मिक साधना आणि प्रक्रियांचं वर्णन आहे. स्वदेशप्रेम आहे, पण अहंकार नाही. अत्यंत खळबळजनक काळात त्याने केलेल्या जगप्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर असंख्य महत्त्वाचे अनुभव व प्रसंग आहेत. वेगवेगळे देश, संस्कृती, राजवटी, माणसं ह्यांचं भावपूर्ण वर्णन आहे. शिवाय पुस्तकांची शैली निव्वळ तात्त्विक किंवा गंभीर नसून हलकी फुलकीसुद्धा आहे (पासपोर्ट घेऊन देश ओलांडताना/ देशात प्रवेश करताना मला लाल फितीमुळे जितक्या अडचणी आल्या, तितक्या अवैध प्रकारे देशांतर करताना कधीच आल्या नाहीत). जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर लोब्संगने केलेला पराक्रम अविरत प्रकारे जाणवत राहतो. माणूस देवपदाला जरी पोचला असला, तरीही त्याला हाल अपेष्टांपासून मुक्ती नाही, जे सत्य जाणवतं आणि आपल्या चाकोरीबद्ध जीवनशैलीतल्या छोट्याश्या समस्यांच्या विरोधात थकणारे आपण दिसतो.....

आणखी महत्त्वाचं म्हणजे ह्या तीन पुस्तकांतून दिसणा-या तिबेटी बौद्ध पद्धतीचं व भारतीय योगपद्धतीतील साम्य. गुरू, कुंडलिनी, प्राण, आकाश, कर्म असे शब्द सहजपणे येतात. एकंदर तिबेटी तत्त्वज्ञानाची कार्यपद्धती पाहिली, तर त्यात ओळखीचं बरंच काही दिसतं. पद्मासनाने व कायास्थैर्यमने सुरुवात होते. ॐ आहे. ध्यान व योग तर आहेच. शिवाय कर्मसिद्धांत, जीवनविषयक दृष्टीकोनसुद्धा तोच आहे. त्यामुळे भारत किंवा अफगाणिस्तान, तिबेट, नेपाळ, चीन, ब्रह्मदेश, सयाम, थायलंड, कोरिया, श्रीलंका ही बौद्ध संस्कृती असलेली राष्ट्रे ह्यात फरक दिसतच नाही. शेवटी व्यापक सहिष्णू संस्कृती एकच आहे, समानच आहे, हे जाणवतं. फक्त इतकेच देश नाही, तर मानवजात एकच आहे, हे दिसतं. ह्यातल्या ब-याच गोष्टी चमत्कारिक, असंभाव्य वाटतील. पण तरीही ह्या पुस्तकांमध्ये आपण प्रत्यक्ष करू शकतो, अशा गोष्टींही मोठ्या प्रमाणात आहे. उदा., श्वासाचा वापर, विचारांवर नियंत्रण, शरीर सामर्थ्य ह्या संदर्भातील. त्यामुळे जरी आपल्याला काही मतं मान्य नसतील, तरीही मन मोकळं ठेवून ह्या पुस्तकांचा आस्वाद नक्की घेतला, नव्हे अभ्यास केला, तरी त्यातून भलंच होणार आहे.

संदर्भ 

लोब्संग राम्पा ह्यांच्याबद्दल माहिती आणि त्यांची पुस्तकं इथून डाऊनलोड करता येतील.

Saturday, May 19, 2012

काळ्या मातीत मातीत....


रणरणता मे महिना. भाजून काढणारं ऊन. अस्मानी आणि सुलतानी दुष्काळ. मागास मराठवाड्यातील एक कोपरा. त्यामधील शेतीची एक झलक.



वखरणीनंतरची रखरखीत जमीन


जमिनीलाच गेला तडा आणि त्यात कापूस उघडा


इतका तरी हिरवा किती प्रदेश असेल?


पशुधन दिसत आहे, चक्क!!!

शेती करता करता आयुष्याची इथे झाली माती
सत्त्व गेले, कस गेला, पीक गेले, गाय बैल गेले, फक्त उरली भिती
पीक आले कर्जाचे, कृत्रिम खताचे आणि बियाणाचे जगण्याची संपली शाश्वती

जगाचा पोषणकर्ता आज रानोमाळ फिरतो
देणा-या हातांची झोळी करून दोन घास मिळवतो
शेत, संसार, जगण्याचा पसारा मोडूनही राब राब राबतो

उत्पन्न गेले, बियाणे संपले, जमीन गेली आणि पाणीही गेले.
परंतु नाही गेली हिंमत, नाही संपली जिद्द आणि नाही सोडला बाणा
सर्व खचले तरी अजून शेतात करतोय पेरणी

उगवेल तो दिवस आणि हवे ते पीक
जेव्हा हटेल दिव्यावरची काजळी
जेव्हा मानवाची जागा निसर्गाच्या मूळाशी असेल

सृजनशीलतीने आणि नावीन्याने देऊ शेतीला उद्योगाचा आधार
झटकू आळस आणि करू अस्सल आणि सकस शेतीचा स्वीकार
अंध:काराच्या ह्या काळरात्री मिळून सारे करू एकच निर्धार


दुधना नदी. लोअर दुधना धरणाचं पाणी असल्यामुळे हा भाग थोडा तरी हिरवा आणि पाणी नेण्यासाठी योग्य दिसतो.....

आजच्या शेतीबद्दल असं जाणवतं की शेती खूप बदललेली आहे. पारंपारिक शहाणपण आणि शाश्वत तंत्रज्ञानाची व कार्यपद्धतीची जागा आज उथळ कृत्रिम खतं, कंपन्यांचं बियाणं आणि सरकारी हस्तक्षेपाने घेतली आहे. सरकारी योजनांच्या आणि विविध माध्यमातून मिळणा-या कर्ज पुरवठ्यामुळे कदाचित शेतक-यांची देण्याची सवय जाऊन जास्त घेण्याची सवय लागली असावी. आज जुन्या अस्सल शेतीची, शुद्ध शेतीची जागा ब-याच प्रमाणात शाश्वत नसलेल्या घटकांनी घेतलेली आहे. त्यामुळे जुन्या शेतीत ज्या ब-याच गोष्टी निसर्गत: मिळायच्या (खत, बियाणं, नैसर्गिक किटकनाशकं जमिनीचा कस, काही प्रमाणात गोधन) त्या सर्व आता जास्तीत जास्त प्रमाणात कृत्रिमरित्या कराव्या लागतात व त्याचे चांगले परिणाम मिळत नाहीत. जवळजवळ प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागत आहे. शिवाय अपर्याप्त शिक्षण, बाहेरच्या जगाचा प्रभाव ह्यामुळे शेतक-यांच्या नवीन पिढीत मेहनतीचं करण्याच्या ऐवजी सहजपणे मिळणारं घ्यायची प्रवृत्ती काही ठिकाणी दिसते. त्यामुळे शेतीतील कस आणि जोम घसरला. बदलत्या काळात जुन्या पद्धतीतील चांगल्या घटकांना जोडधंद्याची व उद्योगाची जोडही देणं आवश्यक आहे. त्यामुळे शेतीकडे आणि शेतक-यांकडे समस्यांचा डोंगर म्हणून न बघता सकारात्मक, स्वयंपूर्ण आणि क्रियाशील दृष्टीने बघितलं पाहिजे.

एका असाधारण जपानी शेतक-याचं ‘नैसर्गिक शेती’बद्दल पुस्तक वाचण्यात आलं. त्यातलं तत्त्व- निसर्गच सर्व काम करत असतो. आपलं काम त्याच्या प्रक्रियेत खारीचा वाटा उचलणं. योग्य वेळी बी टाकणं, त्याची काळजी घेणं इतकंच. ते फार शुद्ध प्रकारे शेती करतात. ‘अनावश्यक कष्ट न करता नैसर्गिक शेती’ असं त्यांचं तत्त्व आहे. अर्थात नैसर्गिक अस्सलपणा असलेल्या व प्रदूषण, कृत्रिम बियाणांचा खतांचा- किटकनाशकांचा वापर नसलेल्या ठिकाणी ते शक्य आहे. कमीत कमी साधनांसह आणि कृत्रिम पद्धतीचा अवलंब न करता तितकीच उत्पादक व शाश्वत शेती करण्याच्या पद्धतीची माहिती ह्या पुस्तकात दिली आहे.


मूळ जपानी पुस्तकाचा 'द वन स्ट्रॉ रिव्होल्युशन' ह्या इंग्लिश अनुवादाचा हा मराठी अनुवाद

थोडक्यात दोन्ही बाजू आपण लक्षात घेतल्या पाहिजे. निव्वळ समस्या आहेत असं नाही. समस्या आहेतच, पण त्यातही अनेक छुप्या स्ट्रेंथस आहेत. त्यांचे उपायही आहेत आणि म्हणून आपण संतुलित दृष्टीकोन ठेवला पाहिजे. शेती म्हणजे समस्या आणि समस्याच असा विचार न करता त्याकडे बघितलं पाहिजे. आणि ह्यावर सर्वात चांगला डोळ्यांपुढे येणारा उपाय म्हणजे जिथे जिथे शक्य असेल, तिथे शक्य त्या प्रमाणात शून्यातून एककडे गेलं पाहिजे. नवीन काही निर्माण केलं पाहिजे. ह्याचं एक उदाहरण इथे बघता येईल.







ह्या काडातून का नाही क्रांती करता येणार?

Monday, March 26, 2012

थरारक गोरखगड.................

सह्याद्री व किल्ल्यांच्या प्रदेशात राहात असूनही किल्ले पाहणं होत नसल्याची लाज वाटून अर्नाळा व वसई हे किल्ले बघून झाले. नंतर अर्थातच एखाद्या गडावर जाऊन यावसं वाटत होतं. इंटरनेटवर गडावर जाणा-या अनेक ग्रूप्सची माहिती मिळते. त्यात थोडं शोधलं आणि माहिती घेतली. वेळ सोयीची होती. कार्यक्रम आकर्षक होता. त्यामुळे मित्रांपैकी कोणीही सोबत येऊ शकले नाहीत, तरी भ्रमंती ग्रूपसह गोरखगडावर जाण्याचा कार्यक्रम ठरवून टाकला.. ट्रेकच्या लीडरना काँटॅक्ट केला आणि सतरा मार्चच्या रात्री कल्याणहून निघण्याची तयारी केली.......


सह्याद्रीचा नजारा.......


गोरखगड आणि ट्रेक....... संपूर्ण नवीन परिस्थिती होती. भ्रमंती ग्रूपसुद्धा आधी अजिबात ओळखीचा नव्हता....... पण सणक आली आणि सर्व ठरवलं. इंटरनेटवरूनच थोडीफार माहिती करून घेतली. ट्रेकबद्दल माहिती ज्या साईटवरून मिळाली, तिथे ह्या ट्रेकची वर्गवारी ‘सोपा’ म्हणून केलेली असल्यामुळे काळजीचं कारण नव्हतं. कल्याण स्टेशनवरच भेटीगाठी झाल्या, ओळख झाली आणि रात्री पावणे अकरा वाजता मूरबाडच्या गाडीत बसलो. ट्रेकचे लीडर मुकेश व रवी आणि नारायण चौधरी हे ज्येष्ठ पण तरुण काका सोबत होते. मुकेश व रवी ह्यांच्या बोलण्यात पेंगाँग त्सो, त्सोमोरिरी, लेह, स्पिती हे शब्द ऐकून अपरंपार आनंद होत होता.............. लदाखची आठवण येत होती....

मूरबाडमध्ये थोडा वेळ थांबून पहाटे साडेबाराच्या एसटीने निघालो आणि जवळजवळ दीड वाजता डेहरे ह्या गावात पोचलो... गोरखगडाच्या पायथ्याशी हे गाव वसलं आहे......... गावात रस्त्याला लागूनच एक घर व ओसरी होती. तिथेच सामान ठेवलं. सर्वत्र सामसूम व अंधार. पण अंधारातही नजर स्थिरावल्यावर समोरच्या बाजूला दोन डोंगर दिसत होते..... आणि आकाशातले तारे जणू त्या डोंगरामध्ये उतरले आहेत, असं वाटत होतं. डोंगरात मंद दिवे दिसत होते. आधी वाटलं की कोणीतरी नाईट ट्रेक करून जात आहेत. पण त्यांची जागा तशीच स्थिर होती.... मग लक्षात आलं की त्या वणव्यामुळे लागलेल्या आगी आहेत........

नारायणकाका गेल्यागेल्या आडवे झाले. अजून काही सोबती जीपने येणार असल्यामुळे रवी आणि मुकेश सर जागे होते. सकाळी लवकर निघायचं असल्यामुळे झोपायची इच्छा होत नव्हती. तरी थोडा वेळ फिरून झाल्यावर त्या घराच्या ओसरीवरच पेपर्स पसरून पडलो. बराच वेळाने जीप आली व बराच वेळ लगबग चालली होती. मग आलेले लोक झोपले आणि शांतता झाली. झोप लागतच नव्हती. थंडीसुद्धा खूप जास्त होती...... त्यामुळे मग उठलो आणि मुकेश सरांसोबत गप्पा मारत बसलो..... वारा अजिबात नव्हता. पण अस्सल गावाकडची थंडी होती.........

शांत निर्जन रस्ता आणि गावातली शांतता..... डेहरे गाव! गावाच्या इतिहासाबद्दल थोडी माहिती घेतली तर दिसतं की हे गाव इतिहासामध्ये सह्याद्री ओलांडून कोकणात जाण्याची एक वाट म्हणून प्रसिद्ध होतं. इतकंच काय, अजूनही महसूली नोंदीमध्ये गावाचं नाव उंबर (म्हणजे कोकणचा उंबरठा ह्या अर्थाने) आहे. आणि डेहरे हे नावसुद्धा उंबरठ्यासाठी असलेल्या दहलीज ह्या उर्दू शब्दाचा अपभ्रंश आहे, असं सांगितलं जातं!! विशेष म्हणजे गावची जुनी लोकसंख्या कित्येक लाख होती, असं लोक सांगतात. सह्याद्रीमध्ये कोकणाच्या उंबरठ्यावर असलेलं असं हे विशेष गाव!!

गप्पा मारता मारता आणि थोडं फिरता फिरता पहाट झाली. पहाटेचा वारा सुटला... आणि वा-याबरोबर थंडी जाऊन गरम हवा येण्यास सुरू झाली... किंचित जळल्याचा वासही येत होता.... मग लक्षात आलं की वणव्याची गरम हवा वा-यामुळे खाली गावाकडे येत आहे..... वणव्याच्या आगीही हललेल्या दिसत होत्या.... झुंजूमुंजू झालं तसे समोरचे दोन डोंगर स्पष्ट झाले. डावीकडचा मच्छिंद्रगड आणि उजवीकडचा गोरखगड होता...... मच्छिंद्रगडाच्या बाजूच्या डोंगरावर लागलेला वणवा दिसत होता...... सकाळी हळुहळु सगळे उठले आणि त्या घरातल्या लोकांना उठवून चहा- नाश्ता सांगितला. उपसरपंच हमीद पटेल ह्यांचं हे घर गोरखगडावर येणा-या सर्व ट्रेकर्सचं स्वागत करतं व त्यांची सोय करतं.


पहाटेच्या चंद्रप्रकाशात डावीकडे मच्छिंद्रगड आणि उजवीकडे गोरखगड.... मच्छिंद्रगडाच्या खाली डावीकडे एक ठिणगी दिसते; तो वणवा होता.

सकाळी निघण्याआधी ओळख परेड झाली. एक दोन जण सोडले तर जवळजवळ सर्वच लोक अनुभवी ट्रेकर होते. आमच्यासोबत कल्याणहून आलेल्या नारायणकाकांनी आदल्याच दिवशी मलंग गड काबीज केला होता...... एकंदरित फ्रेशर फक्त मी आणि अजून एक इतकेच होतो..... भ्रमंती ग्रूपचीही ओळख होत गेली. लीडर स्वत: प्रत्येक गोष्ट करत होते; प्रत्येकाची विचारपूस करत होते. भांड्यातून चहा- पोहे काढून प्रत्येकाची डिश बनवण्याचं कामही लीडर करत होते. तसंच ट्रेकिंग व प्रस्तरारोहणाची त्यांची तयारीही जोरदार दिसत होती. त्यांची बॅगच मुळात अवजड होती.

पहाटे कल्याणहून निघूनही काही जण येणार होते. तेही आले आणि मग सर्व निघाले. लीडर्सनी सर्व सामान बांधून आणि लावून घेतलं. रोप, अँकर, पाण्याच्या बाटल्या, खाद्य सामुग्री, ग्लुकॉन डी घेतलं. ट्रेक मोहिमेमध्ये नेहमी करतात त्याप्रमाणे एक लीडर- रवी समोर तर मुकेश हे लीडर मागे थांबणार होते. रवी आणि नारायणकाका ह्यांच्या सोबत निघालो....


रवी आणि नारायणकाका... रोप बांधण्याची व बॅग बांधण्याची पद्धत त्यांचा अनुभव व कौशल्य दर्शवत होती.

रस्त्याला लागूनच गोरक्षनाथांचं मंदीर आहे. त्याच्या मागून गडाच्या दिशेने पायवाट जाते. एक एक जण येईपर्यंत सुरुवातीला थोडे थांबत गेलो. ज्याप्रमाणे वाहन चालवताना (विशेषत: अवजड वाहन!) ते सुरुवातीला प्राथमिक गेअर्समध्ये चालवून थोडं गरम आणि सक्रिय करावं लागतं व त्यानंतरच वरच्या गेअर्समध्ये नेता येतं, त्याप्रमाणे ट्रेकिंगच्या गेअरमध्ये शरीराला आणण्यासाठी सुरुवातीला हळु जाणंच चांगलं होतं.

मंदीरापासून पुढे आल्यावर लवकरच दाट झाडी सुरू झाली. पायवाट मात्र स्पष्ट व मळलेली होती. पण बरीच अरुंद होती. काही अंतर पुढे गेल्यावर खडा चढ सुरू झाला. गाव आणि रस्ता मागे दूरवर दिसत होते आणि समोर नजारा साकार होत होता...... मच्छिंद्रगड आणि गोरखगड हे दोन पर्वत एकमेकांसमोर उभे राहिलेले दिसत होते. बाजूला भरपूर डोंगर आणि दरीसुद्धा.....






देखों जिधर भी इन राहों में रंग पीघलते है निगाहों में...........


सुरुवातीची शांतता..........


जमीन दूर राहिली.....





थोडं थांबत थांबत आणि फोटो घेत घेत समोर जात होतो. हळुहळु बराच तीव्र चढ सुरू झाला. सुमारे ७० अंशातला तरी चढ असावा. आणि सलग होता. त्यामुळे मध्ये थांबायला जागा नव्हती. एक मोठा चढ पार करून झाल्यावर मग दोन तीव्र उतारसुद्धा लागले. आत्तापर्यंत दाट झाडीने जंगलाचं स्वरूप घेतलं होतं. चढताना सुरुवातीलाच अभयारण्याबद्दल एक पाटी लावलेली होती......

मुकेश सर आणि त्यांच्यासोबतचे मागेच होते आणि इतर सर्व जण रवी सरांसोबत पुढे जात होतो. सोळा जणांच्या ग्रूपमधल्या जवळ प्रत्येकालाच ट्रेकिंगचा बराच अनुभव होता. माउंटेनिअरिंगवर प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलेले आणि कित्येक शिखरे केलेलेही बरेच जण होते. त्यामुळे विशेष अडचण न येता व एक- दुस-याला सूचना देत सर्व जण चढत होतो. माझ्या बॅगमधलं काही सामान खाली गाडीतच ठेवलं असलं तरी पाण्याच्या दोन बाटल्या आणि खाद्य- पदार्थ पाठीवरच्या सॅकमध्ये होते आणि त्या सॅकचा एक बंद तुटल्यामुळे गाठ मारून ती वापरत होतो. काही जणांनी ह्यामुळे चढताना त्रास होईल, हे सांगितलं व सॅक नीट लावूनही दिली. तोपर्यंत विलक्षण नजारा सुरू झाला होता..... खाली दूरवर सपाट भाग आणि आसपास दरी आणि उंच डोंगर..... सह्याद्री!!!

सुरुवात केल्यापासून जवळ जवळ तासाभराने एक चढ बराच तीव्र लागला. मग मात्र काही वेळ बसून आराम केला. सगळेच लोक थोडा थोडा वेळ थांबत येत होते. मग परत चढायला सुरुवात केली. तीव्र चढ असल्यामुळे पायवाटेला लागून असलेल्या झाडा- झुडूपांना व झाडाच्या मुळांना हाताने धरून चढावं लागत होतं. धापा टाकत व दम घेत घेत एकदाचा एक मुख्य चढ पार केला व समोर थोडा सपाट भाग आणि लाल रंगाची एक छोटी मूर्ती दिसली. इथून पुढचा टप्पा सुरू होतो. इथे मग बरेच जण काही वेळ थांबले. तिथे ट्रेकर्ससाठी पुढची दिशा बाणाने दाखवली होती. नारायणकाकांसारखे काही मुरलेले ट्रेकर्स सरळ पुढे निघून गेले.....





ही चढण्याची वाट.....

कूल नारायणकाका

इथून पुढचा ट्रेक हा निव्वळ रॉक क्लाइंबिंग म्हणजेच प्रस्तरारोहण होता!! अर्थात पाय-यासुद्धा होत्या. पण पुढे पुढे त्या तुटक होत गेल्या व त्यामध्ये अंतरही खूप जास्त होतं..... अर्थातच मुरलेल्या ट्रेकर्स व प्रस्तरारोहकांसाठी तो एक सोपा रॉक पॅच होता (आणि खरं म्हणजे रॉक क्लाइंबिंगसुद्धा नाही; कारण पाय-या होत्या ना  :) )...... पण फ्रेशर ट्रेकर्ससाठी मात्र तसा नव्हता.........

बराच वेळ मधल्या सपाट जागेत आराम केला. तोपर्यंत बाकीचेही आले आणि रवी सरांनी सांगितल्याप्रमाणे पुढे जाण्यास सुरुवात केली.... इथून पुढे सर्व रस्ता दगडांच्या स्वरूपातच आहे. मध्ये मध्ये पाय-या व जिन्यासारखी रचना आहे. पण ते तुटलेलेही आहेत. शिवाय मागे काही आधार नाही, एकदम दरीचं एक्स्पोजर आहे (एक्स्पोजर, अँकर, होल्ड, पिनॅकल इत्यादी शब्द ऐकायला मिळत होते!)....... तरीही चढताना तितकी अडचण आली नाही (अर्थात उतरताना कसं होणार, ही भिती मनात होतीच)....... दगडी तुटक पाय-यांमधून चढून वर गेल्यावर किल्ल्याचं प्रवेशद्वार लागतं. एका मोठ्या खिडकीसारखं ते आहे. तिथून आत जाऊन परत वर जाण्यासाठी दगडी वाट मिळते. तिथेच ब्राह्मी लिपीत काही शिल्प कोरलेली आहेत. पण फोटो घेण्यासाठी थांबावं इतकी जागा तिथे नव्हती (किंवा आहे ती जागा पुरेशी वाटत नव्हती!); त्यामुळे फोटो घेता आले नाहीत.


हिंमत से जो कोई चले, धरती हिले कदमों तले.......



खाली लाल ठिपका दिसतो; तिथून मुख्य गुहेपर्यंत चढण्याचा दगडी रस्ता.....

दगडी पाय-यांचा पॅच लवकरच पूर्ण करून किल्ल्याच्या माथ्याच्या पायथ्याजवळ म्हणजे मुख्य सुळक्याच्या प्रारंभिक उंचीवर पोचलो. तिथेच गोरक्षनाथांची मुख्य गुंफा आहे. समोर जवळच मच्छिंद्रगड दिसत होता..... आणि बाजूला सर्वत्र नितांत सुंदर नजारा आणि दरी..... आसपास सर्वत्र सह्याद्रीचे पर्वत सखे दिसत होते......
इथे बरंच दगडी बांधकाम केलं आहे. रात्री इथे मुक्कामाला आलेले ट्रेकर्स दिसत होते. गूहेमध्ये रात्री मुक्कामसुद्धा करता येतो. गुंफा बरीच मोठी आहे. आतमध्ये नवनाथांचे फोटो व देवस्थान आहे. आणि इथे सर्वत्र मर्कटांचा वावर आहे. पण ते दात विचकण्यापलीकडे आणि मधून मधून खाद्य पदार्थ नेण्याचा प्रयत्न करण्यापलीकडे काही उपद्रव देत नाहीत. गडावरच एका बाजूला गोड्या पाण्याचं टाकंसुद्धा आहे.




गुहेतून दिसणारी डोंगररांग



नवनाथ गूंफेतील फोटो


मच्छिंद्रगड सुळका!

गूहेमध्ये बसून थोडा वेळ आराम केला आणि नाश्ता केला. लगेच नारायणकाकांनी एक ऊर्जादायी शवासन करून घेतलं. सुमारे सव्वादोन तासांमध्ये गावातून बालेकिल्ल्यापर्यंत किंवा माथ्याच्या पायथ्यापर्यंत पोचलो होतो...... साडेआठ वर्षांपूर्वी सिंहगड पायवाटेने उभा चढून जाताना चाडेचार तासांमध्ये चढलो होतो, हा ‘विक्रम’ मोडला गेला!

नाश्ता करून आणि थोडा आराम करून पुढच्या टप्प्याला जायला निघालो. एक माहिती मिळाली आणि किंचितसं बरं वाटलं! मुकेश सरांच्या सोबत चढणारे सकाळी बाईकवरून येऊन गटात सामील झालेले दोन जण अर्ध्या वाटेतच थकून मागे उतरून गेले होते....... कमीत कमी काही लोकांसाठी तरी हा गड अवघड होता!! (:0 गूहेच्या आसपास सपाट भाग कमीच आहे. आणि जो थोडा भाग आहे; त्याला लागून लगेचच एक्स्पोजर (सरळ दरी) आहे! गुहेतून निघाल्यावर लगेचच एक पाण्याचं टाकं लागतं. त्यातील पाणी हिरव्या रंगाचं दिसत होतं. पण अधिक महत्त्वाची गोष्ट ही होती, की त्याच्या उजव्या बाजूने पायवाट जात होती आणि त्या पायवाटेपासून दरी किंवा एक्स्पोजर जेमतेम दोन फूटभर अंतरावर होतं. काही जण बिनधास्त प्रकारे बघता बघता पुढे निघूनही गेले........ इथून पुढे नजारा व चित्र कसं असणार आहे, ह्याचा अंदाज त्या वाटेवरून येत होता...... गोरखगडाच्या आव्हानास सुरुवात झाली होती....


हाँ यही रस्ता है तेरा....................




हाच तो सुळका- गोरखगड पिनॅकल!!


मच्छिंद्रगडाच्या सुळक्याच्या पार्श्वाभूमीवर रवी सर.........

कातळ कडेपासून दरीचं एक्स्पोजर फार लांब नव्हतं......  किल्ल्यावरील बांधकाम दिसत आहे.



डाव्या बाजूवरील दगडांना हाताने धरत धरत (धरायला काहीच नव्हतं; पसरट कातळाला हाताने स्पर्श करून धरण्याचा प्रयत्न केला) व वजन शक्यतो डावीकडे ठेवत ठेवत तो भाग कसा तरी पार केला..... इथून पुढचा टॉपचा भाग - पिनॅकल - सुळका भाग अवघड आहे, हे माहिती होतं. तो चढताना कदाचित रोप लावावा लागेल, असंही लीडर बोलले होते. ते त्यानुसार पाहणी करत होते. अजून पुढे चाललो. सुळक्याची सुरुवात असल्यामुळे आणि पायवाट किंवा सपाट भाग अत्यंत अरुंद असल्याने फार पुढे जाण्याची शक्यता नव्हती... तिथेच शक्य तितक्या गडाच्या जवळ उभा राहण्याचा प्रयत्न करत थांबलो...... नजारा अत्यंत सुंदर होता..... दूरवर विस्तीर्ण पठारी भूप्रदेश दिसत होता...... लांब अंतरावर धरणाचं पाणी दिसत होतं..... सर्व नितांत सुंदर नजारा होता; पण ह्या सर्व दूरच्या गोष्टी होत्या. सर्वांत जवळची गोष्ट- एक्स्पोजर आणि दरी!!!

लीडर्सनी शोधाशोध केली आणि सुळक्यावर कुठून चढायचं ही जागा ठरवली. गोरखगडावर त्यांपैकी काही जणच काही वर्षांपूर्वी येऊन गेले होते. सर्वांना बाजूला घेऊन प्रस्तरारोहण कसं करायचं ह्याची माहिती कैवल्य सरांनी दिली. त्यांना रॉक क्लाइंबिंगचा वीस वर्षांचा तरी अनुभव आहे. त्यांनी काही सूचनाही केल्या.

• चढताना जास्तीत जास्त भार पायांवर आणि पायाच्या बोटांवर द्यायचा. हातांवर भार घ्यायचा नाही; हात फक्त दगडांना धरून आधार देण्यासाठी आहेत. आपल्या हातांना आपलं वजन फार वेळ घेता येत नाही. कारण आपल्या हाताच्या बोटांमध्ये तेवढी ताकत नसते. पण आपण आपल्या पायांवर जास्त वजन देऊ शकतो; कारण त्यामध्ये ती ताकत असते व आपण दिवसभरात दोन तास तरी आपल्या पायांवरच असतो.
• दगडामध्ये अनेक ठिकाणी खोबणी व खाचा आहेत. बाहेर आलेले काही दगड व दगडाचा भाग आहेत. त्यावर पाय आणि हात ह्यांना होल्ड करून वर चढायचं.
• चढताना दगडी वाट मध्ये मध्ये वळण घेते आणि दगडी वाटेची रुंदी अत्यंत कमी (कुठे कुठे तर जेमतेम एक फूट आणि कुठे कुठे तर त्याहून थोडी व मोठी गॅप असलेली) आहे; त्यामुळे पाठीवरची सॅक कातळाला घासेल व तुम्हांस खाली फेकू शकेल. तेव्हा तिथून जाताना तिरपं वळण घेऊन जा; म्हणजे सॅक कातळाला घासणार नाही.
• जर फ्री- क्लाइंबिंग (रोपचा वापर न करता) करताना बॅलन्स गेला व पडला, तर शरीर पसरवा. हात- पाय लांब करा. म्हणजे पडल्यावर तुम्ही थांबू शकाल आणि बाउंस होणार नाहीत. जर हात- पाय जवळ घेतले तर सरळ दरीत पडू शकाल (माकडांची भिती असल्यामुळे व पाण्याची गरज असल्यामुळे सॅक्स सोबत न्याव्या लागत होत्या).
• उतरताना ज्या पोजिशनमध्ये चढलो, तसंच म्हणजे दरीकडे पाठ करून उतरायचं आहे. सरळ उतरण्याचा प्रयत्न करू नका; हातांवर भार देऊ नका.

त्यांनी सोबत असलेल्या साधनांची माहिती दिली व भ्रमंती ग्रूपमध्ये नेहमी सुरक्षेला प्राधान्य दिलं जातं व म्हणून सर्व जण सुरक्षित प्रकारे चढणार आहोत, हे सांगितलं.....

मनामध्ये प्रचंड धाकधुक होती..... कारण कितीही काळजी घेतली तरीही एक्स्पोजर जरा जास्तच होतं!!! एका मागोमाग एक जण चढण्यास सुरुवात झाली. ब-याच महिला आणि मुलीसुद्धा सहजपणे चढत होत्या. ट्रेकमध्ये भावनाताई म्हणून एक होत्या; त्यांनी तर हिमालयातलं ७००० मीटर उंचीचं एक शिखरही सर केलं होतं!!

पण सर्वच जण असे सहजपणे चढू शकले नाहीत....... मला तर चढताच येत नव्हतं..... ): कारण कसं चढणार? उभा कातळ. पहिलं पाऊल चढून गेल्यावर पाय ठेवायला जागाच नाही. बरं वर कशाला हाताने धरून मग पाय वर घ्यावेत; तर तेही नाही. असाच थोडावेळ अडकलो. मग वरच्या आणि खालच्या दोन्ही बाजूंच्या लोकांनी हात व पाय कुठे ठेवायचे ते सांगितलं. कसं तरी ते करून बघितलं आणि कसं तरी अक्षरश; कसं तरी वरती चढलो. पण ही फक्त सुळक्याची सुरुवात होती...... सुळक्यावर पुढे अशाच दगडी वाटेचा सुळसुळाट होता!

काही पाय-या होत्या. पण त्याही अत्यंत अरुंद व मध्ये मध्ये मोठी म्हणजे चार- पाच फूट गॅप असलेल्या पाय-या होत्या. पण तिथे ब-याच ठिकाणी हाताने होल्ड करण्यासाठी खाचा व खोबणी केलेल्या आहेत. मध्ये मध्ये दगडी वाटेला लागून छोटी भिंतही आहे (एक्स्पोजर नसावं म्हणून)! परंतु तरीही अत्यंत अरुंद पाय-या आणि मागे सरळ दरी........... त्यातच ती वाट वळण घेणार.... आणि आपली सॅक कातळाला घासून आपला बॅलन्स अजून घालवणार...... बरं, पाय-याही सलग नाहीत. खोबणी/ खाचा/ होल्डही सलग नाही. त्यामुळे मध्ये असंच अडकून पडणार...... कसा तरी तिथला पॅच पूर्ण केला. वर अजून एक छोटी गुहा होती. तिथे बसलो आणि खालचं दृश्य पाहिलं. एक एक करून सर्व वर येत होते. काही उत्साही आणि गतिमान पुढेही गेले होते. त्या वेळेस मात्र तिथून एक पाऊल वर टाकावसं वाटत नव्हतं. का टाकायचं? का पेक्षा कसं टाकायचं हा प्रश्न होता. पुढची वाट अशीच बिकट असणार होती. अजूनच धोकादायक होती. त्यामुळे आधीच इतका धोका पत्करलेला असताना अजून का वर जायचं? असे प्रश्न पडले आणि तसाच बसून राहिलो. पण ग्रूपने ट्रेक करत असल्याचा फायदा झाला. पश्चिम रेल्वेत काम करणा-या एका ताईंनी बसू दिलं नाही. “थोडसंच अंतर आहे, पाय-याही आहेत,” म्हणून मोटिव्हेट केलं.

मनाशी विचार केला, आधीच इतकं वर आणि इतकं धोकादायक प्रकारे आलो आहोत. खाली जाताना फुल वाट लागणारच आहे. तिथे काही बदल होणार नाही. त्यामुळे आधीच इतकी जास्त रिस्क आहे, तर अजून थोडी रिस्क घेतली तर काय मोठं बिघडणार? जी वाट लागणार आहे, ती उतरताना तशीही लागणारच आहे.... मग कशाला थांबायचं? असा विचार करून निघालो!!!

एक दोन ठिकाणी अडकलो; पण पुढे जाऊ शकलो आणि आला....... गडाचा सुळका आला!!!!! इथे मात्र वर अजून कोणता भाग शिल्लक राहिला नव्हता. अगदी माथ्याच्या माथ्यावर पोचलो..... सर्वत्र नजारा होता.... सह्याद्रीच्या अनेक डोंगरांची रांग दिसत होती.... समोरच मच्छिंद्रगड दिसत होता; पण तो आता बुटका वाटत होता. दूरवर.... खाली कित्येक अंतर दूरवर सपाट जमीन आणि रस्ता दिसत होता........................................ तिथपर्यंत कधी पोचू शकू, असं खरोखर, अगदी खरोखर, वाटतच नव्हतं!

एका बाजूला सिद्धगड आणि आसपासची डोंगररांग दिसत होती. दुस-या बाजूला नाणेघाट, हरिश्चंद्र गड असे गड व पर्वत होते. तिथून आकाश स्वच्छ असेल तर कोकणकडा, कळसूबाई हेही दिसू शकतात, असं म्हणतात. पण हवा तितकीशी स्वच्छ नव्हती. त्यामुळे दूरचे डोंगर नीट दिसत नव्हते. पण त्यांची प्रसिद्ध रांग मात्र दिसली.


सुळक्याच्या माथ्यावरील मंदीर! आलो एकदाचे.......



सुळक्यावरून दिसणारा सिद्धगड आणि इतर डोंगर


शिखरावर जाणं इतकं अवघड आहे तर सचिन व द्रविड कसे राहात असतील?




सह्याद्री पर्वतमधील सपाट भाग दिसत आहे....





हरिश्चंद्रगड, नाणेघाट, दमदम्या, कळसूबाई इत्यादि ह्या बाजूला आहेत.

गडाच्या माथ्यावर चक्क एक छोटं मंदीर बांधलेलं होतं. काही झाडं लावलेली आहेत. भगवा ध्वज लावलेला होता. तिथे मात्र बसण्यासाठी (सुरक्षित) जागा होती...... तिथे थोडावेळ बसलो. सर्व सोबती आल्यावर फोटोसेशन सुरू झालं. काही लोक एकदमच दरीच्या तोंडाशी जाऊन बसत होते..... उगीचच भिती देत होते...... मग मस्तपैकी ग्रूप फोटो काढले. लीडर्सनी ग्लुकॉन डी दिलं (पण मला घ्यावंसं वाटलं नाही, जिथे जगण्याचीच शाश्वती नाही, तिथे इतर सर्व व्यर्थ!!); काही लोकांना जास्त काठावर जाऊ नका असं बजावलं! उतरताना कातळ तापेल आणि पकडताना अडचण होईल, असं त्यांनी सांगितलं. तेव्हा मग उतरून (शक्य असल्यास उतरून आणि शक्य असल्यास व जमल्यास दरीच्या काठा काठाने सुळक्याला वळसा घालून) मुख्य गुहेत जेवण करून निघायचं ठरलं. सुळक्यावर पोचल्या पोचल्या विचारलं की, उतरण्यासाठी दुसरी वाट आहे का, तर उत्तर नकारार्थी मिळालं होतं..............


(फोटो सौजन्य: भ्रमंती ग्रूप व सदस्य)

उतरताना मजाच मजा होती.............. भयानक......... अशक्य........... भयानक अवघड अनुभव ठरणार होता तो आणि ठरलासुद्धा! काही आघाडीचे लोक उतरले. हळु हळु वळून आणि दरीकडे पाठ करून उतरण्यास त्यांनी सुरुवात केली. मीही धीर करून उतरण्यास सुरुवात केली. (अन्य काहीच करता येऊ शकत नसल्यामुळे उतरण्याचा ‘धीर’ केला). काही पाय-या उतरून गेल्यावरच मी अडलो. तिथून पुढचे चाळीस मिनिट माझ्यासाठी जीवन- मरणाचे होते!! उतरता येऊच शकत नव्हतं. २ पाय आणि २ हात ठेवण्यासाठी १ जागाही मिळत नव्हती!! तेव्हा एकमेव शरीर कसं उतरवणार? पाय-या सलग असत्या आणि होल्डस मजबूत असते; तर उतरता आलं असतं. पण पाय-या आणि होल्डस- खाचा/ खोबण्या/ बाहेर आलेला कातळाचा भाग ह्यामध्ये मोठी गॅप होती आणि एक्स्पोजर! त्यामध्ये तर अजिबातच गॅप नव्हती!

शेवटी रवी सरांच्या मार्गदर्शनानुसार, सूचनांनुसार आणि नंतर त्यांच्या आदेशानुसार अक्षरश: एक एक पाऊल, एक एक हात ठेवत ठेवत कसं तरी खाली येण्यास सुरुवात करण्याचा प्रयत्न सुरू केला. प्रत्येक पाऊल टाकताना त्यांना विचारावं लागत होतं. एक पाय खाली टाकताना खालची पायरी किंवा दगडाचा बाहेर आलेला भाग – पायाचा होल्ड इतका खाली व बाजूला असायचा की तिथे पाय ठेवला तर हमखास बॅलन्स जाणार आणि फक्त वरचा पाय आणि हात ह्यांवर बॅलन्स होणार नाही, हे अगदी कन्फर्मली दिसायचं. बरं, पाय तसेच ठेवून जरा वाकून हाताला होल्ड घ्यावा म्हंटलं, तर तोही नाही. आणि जास्त वाकलो तर बॅलन्स जायची खात्री! बराच वेळ अडकून अडकून खाली येत होतो. मग कैवल्य सर मदतीला आले. त्यांनीही प्रत्येक पाऊल व हात हलवताना सूचना केल्या. मला अगदीच जमत नाही, असं पाहून मग ते माझ्या खाली आले व त्यांनी त्यांचा हात व पाय मला होल्ड म्हणून वापरू दिला.... तेव्हा कुठे सर्वांत वरचा भाग उतरू शकलो.


येताना लागलेली वाट
(फोटो अभिषेकने घेतलेला आहे)

वाटेत थोड्या पाय-या होत्या आणि छोटी भिंतही होती. अक्षरश: कसं तरी आणि जीव होल्ड करून तो भाग ओलांडला. पण पुढे अडलो. रवी सर त्यांचा पूर्ण पेशन्स होल्ड करून मला सूचना देत होते. एक एक पाऊल/ हात कुठे ठेवायचा ते सांगत होते. उतरताना एका वेळी तर रवी सरांच्या हातांवरही पाय ठेवून होल्ड करावा लागला.... कसं तरी आणखी काही स्टेप्स उतरलो. परत थोड्या पाय-या मिळाल्या. आणि मग जिथून सुरुवात केली होती; त्या सपाट भागाच्या म्हणजे माथ्याच्या पायथ्याच्या वर आलो. इथूनच वर येताना काही वेळापूर्वी बरीच अडचण आली होती. इथे थोड्या स्टेप्स होत्या आणि तिथून उतरताना मात्र दहा- बारा फूटांमध्ये होल्ड जवळजवळ नव्हताच. मग सरांना विचारलं, सर तुम्ही सांगाल, तसं थोडं अंतर उतरतो; नंतर मग उडी मारू का? इथेही एक्स्पोजर होतंच; पण पाच- सहा फूट सपाट जमीन होती......... तर सरांनी त्याला नकार दिला. रॉक क्लाइंबिंगमध्ये अगदी दोन फूटांची उडीही मारायची नाही, असं बजावलं! (कारण उडी मारल्यामुळे दगड हलू शकतात) मग मी उतरणार कसा? तोपर्यंत त्यांना माझ्या परिस्थितीची कल्पना आली होती. मी उतरणं जवळजवळ अशक्य आहे, हे त्यांनाही पटलं होतं. त्यामुळे त्यांनी सरळ मला रोप लावला. पोटाभोवती रोप घट्ट बांधला. त्याचं वरचं टोक त्यांनी त्यांच्याजवळ फिक्स करून ठेवलं. आणि मग मला एक एक पाऊल ठेवण्यासाठी सूचना दिल्या.

खाली असलेले नारायणकाकाही मला सूचना देतच होते. रोप लावून उतरण्यास सुरुवात केली..... आयुष्य होल्ड करण्याचा प्रयत्न करत होतो. अर्थातच हात- पाय ठेवायला आणि त्या स्थितीत बॅलन्स करायला जागा मिळत नव्हती. एक स्टेप घेऊन खाली आलो. इथून सपाटीचं अंतर जेमतेम सहा फूट होतं. पण सर उडी मारू देणार नव्हते. पुढे होल्डच मिळत नव्हता; म्हणून मग त्यांनीच हळुहळु रोप सोडला. रोपने मला होल्ड केलं शेवटी!! मग दगडाला हात लावून थोडं घसरत घसरत खाली येऊन सपाट कातळावर टेकलो. सरांनी अलगद रोप सोडून मला उतरवलं होतं!!! उतरताना नारायण काकांनीही मदत केली. त्यांनी मलाच नाही, तर येणा-या सर्वांना मदत केली आणि जिथे आवश्यक वाटलं तिथे आपल्या हाताचा होल्ड उतरणा-याच्या पायासाठी दिला!

एकदाचे पाय थोड्या सपाट भागावर टेकवले; रोप सोडवला आणि हुश्श केलं!!! धोक्याच्या सर्वाधिक पातळीचा पहिला टप्पा पार झाला होता....... पण अजूनही आयुष्य होल्डवर ठेवलं असल्यासारखं वाटत होतं!! जरावेळ बसावसं वाटलं; पण सावली दरीलगत होती... म्हणून कातळाजवळ उभा राहिलो.... (:

वर चढताना मला उत्तेजन देणा-या व माझ्यामागोमाग उतरणा-या ताईंनाही तीच अडचण झाली व त्यांनाही शेवटी रोप लावूनच उतरावं लागलं!! We two were the only dignitaries who were granted the rope- facility!! हळुहळु सर्व जण उतरले. पण आमच्या इतकं अवघड कोणालाच गेलं नाही. थांबत थांबतच येत होते; पण त्यांना होल्ड मिळत होते...... काही वेळ तिथे थांबलो.....

पण अजून धोका संपला नव्हता. पहिला धोका मुख्य गुहेच्या आधीच होता..... मुख्य गुहेच्या आधी पाण्याच्या टाक्याजवळून जावं लागणार होतं. आणि तिथे तर एक्स्पोजर सर्वांत जास्त होतं. होल्डही काही नव्हता. उजव्या बाजूला असलेल्या कातळाला हात लावून हातामुळे होणा-या घर्षणावर शरीर होल्ड करून जायचं होतं! त्या वेळी नारायण काकांची मदत घेतली. ते पुढे निघाले व त्यांनी मला रस्ता दाखवला. मुख्य म्हणजे मनाने सोबत दिली, होल्ड केलं! त्यामुळे कसं तरी तोही पट्टा ओलांडला..... दरीजवळून पुढे जाऊन मुख्य गुहेत पोचलो!!!! जय गोरक्षनाथ!!!! असं म्हणावसं वाटलं..... धोका संपला नव्हता, पण कमी झाला होता आणि थोडा वेळ सुरक्षित प्रकारे थांबता येणार होतं!!!!

जमीन व रस्ता दूरवर दिसत होते. जमीनीकडे जाण्याचा प्रवास सुरू झाला होता..... ह्या वेळेस लदाखची आठवण झाली. तिथल्या अतिउंचीवरच्या भागामध्ये फिरताना बर्फ व सर्व नजारा पाहून विलक्षण आनंद झाला होता. अप्रतिम निसर्ग होता.... पण... पण नंतर बर्फाने अशी थंडी अंगात भिनवली, की बस्स....... “हा बर्फ, हा नजारा सर्व खूप सुंदर आहे, ठीक आहे, पण आपल्याला आपली जमीनच बरी” असं वाटलं होतं!! इथेही तशीच परिस्थिती होती; किंबहुना जास्त बिकट परिस्थिती होती...... इथे खाली आपण कधी काळी उतरू शकू, ही खात्रीच वाटत नव्हती. गुहेपर्यंत येऊनसुद्धा!!


मच्छिंद्रगड सुळक्याच्या पार्श्वभूमीवर खालील पठार...... एका ठिकाणचा वणवा दिसतो.

गोरखगडावरची तीन माकडं!!!


गूंफेमधील भिंत

गोरक्षनाथ!! नवनाथ संप्रदायाच्या संस्थापकांपैकी एक. त्यांचं हे साधनास्थल! गोरक्षनाथांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कळालं की ते १३ व्या शतकाच्या कालखंडातील महान शैव पंथी साधक होते आणि त्यांचे शिष्य तत्कालीन नेपाळ, उत्तर प्रदेशपासून अफगणिस्तानपर्यंत पसरलेले होते! आजही ह्या ठिकाणी त्यांच्या शिष्यांचे पुरावे सापडतात. नेपाळमधील गूरखा लोक किंवा दार्जिलिंगजवळचा गूरखालँड भाग मागणारे लोक त्यांचेच शिष्य असल्यासारखे आहेत आणि गोरखपूर हा जिल्हासुद्धा त्यांच्याच नावाने झालेला आहे, ही माहिती मिळाली!! असे हे गोरक्षनाथ इथे कित्येक शतकांपूर्वी राहिले होते! ह्या इथे!!! इतक्या अशक्य जागी!! थरारक! त्या काळी देशभर इतकं फिरणं, अशा दुर्गम जागी येऊन साधना करणं किती महान असेल!!! आणि कदाचित गुहा, दगडी पाय-या व ब्राह्मी लिपीतील शिल्पं! ह्या दगडी पाय-या किंवा खाचा बनवणा-यास कोणी होल्ड केलं असेल? किंवा सुळक्याच्या माथ्यावर मंदीर बांधताना सामान कसं नेलं असेल? अद्भुत... अचाट..... विराट........

गोरखगडाबद्दल फार माहिती मिळत नाही. शहाजी राजांच्या कारकिर्दीत ह्या गडाला विशेष महत्त्व होतं, असं म्हणतात. पण आधी उल्लेख केल्याप्रमाणे जर डेहरे खरोखर मोठं (त्या काळच्या मानाने कित्येक लाख लोकसंख्या म्हणजे फार मोठं असलं पाहिजे) गाव असेल व ते गाव कोकणात जाण्याचा उंबरठा असेल, तर निश्चितच हे स्थान व हा किल्ला धोरणात्मक दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतो. गोरखगड सह्याद्रीच्या मुख्य रांगेलगत आहे व किंचित विलग आहे. त्यामुळे टेहळणीसाठीही त्याचं स्थान महत्त्वाचं आहे. तसंच कल्याण- नगर महामार्ग (जो आम्ही मूरबाडच्या पुढे सोडून आत आलो) सुद्धा इथून तोफांच्या टप्प्यात असावा. आजचे महामार्ग हे ब-याच प्रमाणात प्राचीन मार्ग व वाटांवरूनच घडलेले असतात. हे लक्षात घेतलं आणि कल्याण बंदर होतं हे लक्षात घेतलं, तर ह्या गडाचं महत्त्व कळू शकतं....

...सर्व मंडळी सुळक्याच्या शिखरावरून गुहेत आल्यावर जेवणाचा कार्यक्रम झाला. मर्कटचेष्टा चालूच होत्या. पण ते त्रास देत नव्हते. जेवण झाल्यावर काही उत्साही ट्रेकर अगदी कड्यावर रेलून किंवा झोपून फोटो काढत होते!!! लीडर लोकांनी गुहेवर कातळात लावलेले काही अँकर दाखवले. इथून सरळ माथ्यावर पूर्वी रॉक क्लाइंबिंग करून जात असत. म्हणजे अँकरमध्ये रोप लावून रोपला लटकून वर चढायचं, असं. पण आता ते दगड नाजुक झाले आहेत आणि सडले आहेत; त्यामुळे तिथून कोणी चढत नाही, अशी माहिती मिळाली. रवी सरांनी रॉक क्लाइंबिंगबद्दलही माहिती दिली. आता दोराला धरून चढण्याऐवजी पोटाला दोर (रोप) बांधून चढतात. कारण जर दोराला धरून अनेक जण चढत असतील; तर त्यात धोका असतो. शिवाय दोर हातामधून सुटण्याची शक्यता असते. म्हणून पोटाला दोर बांधून मग हात आणि पाय वापरून चढण्याची जास्त सुरक्षित पद्धत वापरली जाते, असं ते म्हणाले.... गुहेसमोर परत एकदा ग्रूप फोटोसेशन झालं. गुहेच्या आसपास लोकांनी टाकून दिलेला कचरा सर्वांनी मिळून एका पोत्यात भरला. मोबाईल आणि मुक्त असलेल्या काही जणांनी गोड्या पाण्याच्या टाकीतून पाणी भरून आणलं.


मुख्य गुहेच्या वरून रॉक क्लाइंबिंगचा जुना पॅच. काही अँकर्स अडकवलेले दिसतात.

परतीच्या मार्गावर जाताना खूप हलकं वाटत होतं.... कारण पुढे धोका होता; पण तो वरच्या मानाने काहीच नव्हता. आणि प्राणांतिक नव्हता..... त्यामुळे आयुष्य होल्डवर ठेवण्याची गरज नव्हती...... परत एकदा रवी सरांच्या सोबतच उतरण्यास सुरुवात केली. आता त्यांनीही त्यांचा पेशन्स होल्डवर ठेवला नव्हता; त्यामुळे तेही मला कडक मास्तराप्रमाणे (इथे मी मदत करणार नाही, तूच बघ) सूचना देत होते..... पुढे उतरताना अडचण आली नाही. फक्त काही ठिकाणी हात- पाय कुठे ठेवायचे ते विचारावं लागलं. आणि कातळ भयानक तापला होता! हात होल्ड होतच नव्हता!!! वळताना थोडं अडकलो आणि मग उतरलो. नंतर पुढे पाय-याच होत्या.

सर्वांत आधी नारायणकाका पायवाट संपत होती, तिथे जाऊन पोचले होते. लवकरच तिथे जाऊन पोचलो आणि पायवाटेच्या स्वरूपात धरणी माय भेटल्याचा आनंद झाला!!! पुढे मग नारायणकाकांसोबत सरसर उतरण्यास सुरुवात केली. जमिनीची व सुरक्षिततेची ओढ लागली होती...... वाटेमध्ये अडचण फक्त तीव्र उताराची व थकून जाण्याची होती. पण त्या withhold करत जाऊ शकत होतो! शिवाय आता धरणी मायसुद्धा विरुद्ध नसून सोबत होती!

उतरतानाही तीव्र उतार होता, तिथे अडचण आलीच. कारण तिथेही होल्ड मिळत नव्हता. एकदम घसरायला होत होतं आणि सलग तीव्र उतार असल्यामुळे घसरून चालणार नव्हतं. इथेही लीडरनी सांगितलेली सूचना आठवली. पाय तिरपे करून टाचेवर वजन ठेवून चालायचं. पण त्यांच्या इतर सूचनांप्रमाणे ही सूचनाही पाळता येत नव्हती! (: त्यामुळे कसं तरी, जमेल तसं गती कमी ठेवण्याचा प्रयत्न करत उतरत होतो. वाटेतले झाडं- झुडुपं, झाडाचे खोड आणि मुळं ह्यांचा आधार घेतला. ग्रिप असलेले बूटसुद्धा घसरत होते. त्यामुळे अनेक वेळेस तर सरळ जाऊन झाडांना पकडावं लागलं; कुठे कुठे घसरून उतरावं लागलं.... गती कमी करण्यासाठी शरीराच्या घर्षणाचा वापर करण्याची ही पद्धत क्रिकेटपटू बॉल सीमारेषेच्या आत होल्ड करताना वापरतात!

उतरतानाही थकायला होत होतं. कारण आता दुपारचे साडेतीन वाजले होते! थोडा वेळाने थोडं थांबून व थोडं थोडं पाणी पिऊन पुढे उतरत होतो. नारायणकाकांनी सांगितलं की हृदयाचे ठोके सामान्य होईपर्यंत थांबावं ते सामान्य झाल्यावर थांबू नये; नाही तर परत हृदयावर ताण पडतो.


जमिनीची सुरक्षितता!

अजूनही जमीन व रस्ता दूर दिसत होता. सभोवती झाडी व नजारा. पण दुपारच्या उष्ण झळा होत्या.... मी आणि काका आम्ही दोघंच पुढे होतो. बाकी लोक बरेच मागे राहिले होते. जमीन कधी एकदा येते, असं झालं होतं. हळु हळु उतार कमी झाला; पायवाट सोपी होत गेली आणि एकदाचे गोरक्षनाथांच्या मंदीरात येऊन पोचलो!!!! समोरच रस्ता दिसत होता. त्यावरून काही वाहनं जाताना दिसत होती....................................................

मंदीरात थोडा वेळ टेकलो. तिथेच पाणी मिळालं. हळुहळु धापा टाकत इतरही जण आले. बराच वेळ तिथेच बसून राहिलो आणि मग खाली गावात पोचलो. उपसरपंच हमीद पटेलांच्या उंबरठ्यावर थोडा वेळ आराम केला. तोपर्यंत इतर सदस्यांना उशीर होण्याचं कारण कळालं. एका मुलीला उन्हाचा त्रास झाला होता व ताप आला होता. त्यामुळे तिला थांबत थांबत यावं लागलं. नंतर ती मंदीरात आल्याचं कळाल्यावर मुकेश सर तिच्यासाठी गावातून सरबत घेऊन मंदीरात गेले...... गावातून गोरखगड आणि मच्छिंद्रगड किती सुंदर दिसत होते............. :)

अशी ही भ्रमंती ग्रूपसोबतची गोरखगडगाथा!!! भ्रमंती ग्रूपचं काम फारच सुंदर आणि नीटनेटकं वाटलं. भ्रमंती हा काही वर्षांपूर्वी नोंदणी झालेला न्यास (ट्रस्ट) आहे. आणि ही एक विना- नफा तत्त्वावर चालणारी संस्था आहे. त्यांचा मुख्य भर रॉक क्लाइंबिंगवर आहे. ट्रेकिंग ते कमीच करतात. पण मुख्य म्हणजे त्यांनी त्यांचं धोरण ना- नफा ठेवलं आहे. ते ज्या मोहिमा, ट्रेक्स आयोजित करतात, त्याचा ते अगदी थोडा खर्च घेतात. म्हणजे संस्थेसाठी म्हणून नाममात्र पन्नास रूपये शुल्क; बाकी सर्व प्रवास, खाणं- फिरणं ह्याचा होईल तितका खर्च. जाणीवपूर्वक त्यांनी आर्थिक नफ्यापासून स्वत:ला दूर ठेवलं आहे. कारण एकदा आर्थिक गोष्ट सुरू झाली, की इतर प्राथमिकता बदलतात आणि फिरण्यातली, एडवेंचरमधली मजा जाते, असं त्यांना वाटतं. संस्थेची ही भुमिका संपूर्ण ट्रेकभर जाणवत होती. लीडर्स अनुभवी होते. त्यांनी सर्वांना खूप मदत केली आणि मी त्यांच्या मदतीचा सर्वाधिक लाभ घेतला..... एक स्टेक- होल्डर म्हणून! फक्त नम्रपणे त्यांना एक सूचना केली, की गोरखगड ट्रेक ‘सोप्या’ वर्गवारीत नसावा! तसंच कितीही म्हंटलं तरी ह्या ट्रेकमध्ये अनेक टेक्निकल गोष्टी होत्या. उदा., सॅक पाठीला चिकटून राहील अशी बांधणं (ज्यामुळे बॅलन्स करताना त्रास होणार नाही), जीन्सची पँट न वापरणं, एक दिवस आधीपासून जास्तीत जास्त पाणी पिणं इत्यादी. शिवाय असंही वाटलं की कुठे तरी सर्व येणारे सोबती ट्रेकिंगचा/ क्लाइंबिंगचा अनुभव असलेलेच असतील, असंही गृहित धरलं गेलं असावं. ते काहीही असलं तरी लीडर्स व भ्रमंती सदस्यांनी हा ट्रेक यशस्वीपणे संभाळला आणि सर्वांना होल्ड करून तो यशस्वीपणे पूर्ण केला!! त्यांचं मन:पूर्वक अभिवादन!!

ह्या अनुभवातून आणखी काही गोष्टी जाणवतात. ट्रेक करताना दमछाक होणे, मुद्दाम आराम करावा लागणे आणि आल्यावरही एक दिवस थोडं अस्वस्थ वाटणे व हातपाय दुखणे ह्या गोष्टी काय दर्शवतात? त्याच वेळेस नारायणकाका हे ज्येष्ठ तरुण संपूर्ण ट्रेक सहजगत्या पूर्ण करतात. ह्यातून काय धडा घ्यायचा? आरोग्य, फिटनेस आणि स्टॅमिनाबद्दल निश्चितपणे विचार करण्याची गरज आहे. चुकीच्या लावलेल्या सवयी मोडण्याची गरज आहे. चांगल्या सवयींना व पद्धतींना भरपूर एक्स्पोजर देण्याची गरज आहे!! हा ट्रेक जरी अवघड आणि ‘धोकादायक’ गेला असला, तरी आणखी काही सोप्या ट्रेक्सचं एक्स्पोजर मिळाल्यास असा ट्रेकसुद्धा होल्ड करता येऊ शकेल............