Monday, July 28, 2025

Tour de Parbhani!

395 km cycle riding in 3 days

Hello. As a preparation for "Yoga for fitness" initiative of Niramaya Yoga Prasar and Sanshodhan Kendra, Parbhani, Maharashtra, recently I cycled 395 kms in 3 days from Pune to Parbhani. I had done three stages. First from Pune to Ahilyanagar (123 kms), then from Ahilyanagar to Beed (130 kms) and the last stage from Beed to Parbhani (142 kms). Despite of rains and muddy track, I enjoyed it. On the way I also met school students and had interactions with others. The time duration for this cycle ride was just double of a bus travel on the same route. With regular practice, a cycle almost works like a scooty!



During the course of these days, enjoyed serene nature and greenery. I also passed through some spectacular mountain region. Sometimes the roads were testing. When it was difficult, I just tuned in and recalled my favourite songs. When we divert our attention to other subject, it helps to reduce the stress. And peaceful nature also helps us to become calm. I also met people who were in a way related to my family. I also interacted with hostel students and shared with them that doing such things is capacity of everyone. It is up to us to use and tap this capacity.





This 3- day cycle tour was part of preparation for the South India cycle expedition, to be started in next month. This initiative by "Niramaya" will start from Bangalore. Its route will be- Bangalore- Mysore- Ooty- Isha Adi Yoga- Kochi- Kanyakumari- Rameshwaram- Pudducheri- Chennai and it will cover around 1850 kms. Will share its details soon. Thank you.

-Niranjan Welankar 09422108376. Sky watching, meditation, fun- learn, fitness sessions. Date of writing the post: 28 July 2025. 

Tour de Parbhani! 

सायकलीवर पुणे- परभणी प्रवास

✪ केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे
✪ तीन दिवसांमध्ये ३९५ किलोमीटर सायकलिंग
✪ नियमित सायकलिंग = स्कूटीचा वेग
✪ रमणीय निसर्ग आणि डोंगररांगा
✪ निसर्गासोबत धारणा आणि ध्यान
✪ सायकलीची लोकांना जोडण्याची क्षमता
✪ जुन्या ऋणानुबंधांना उजाळा
✪ विद्यार्थ्यांसोबत संवाद आणि गप्पा

नमस्कार. परभणीच्या निरामय योग प्रसार व संशोधन केंद्राच्या "Yoga for fitness" सायकल अभियानाच्या तयारीसाठी नुकताच पुणे ते परभणी सायकल प्रवास केला. पुढच्या महिन्यातल्या दक्षिण भारतात १८०० किलोमीटरच्या सायकल अभियानाची तयारी सुरू आहे. त्याच तयारीचा भाग म्हणून ही अशी राईड करावीशी वाटली. 

पहिल्या दिवशी पुणे ते अहिल्यानगर (१२३ किमी), दुसर्‍या दिवशी अहिल्यानगर ते बीड (१३० किमी) आणि तिसर्‍या दिवशी बीड ते परभणी (१४२ किमी) असे टप्पे केले. काहीही त्रास न होता आरामात हे टप्पे करता आले. पहिल्या दिवशी प्रचंड पाऊस व चिखलाचा अनुभव मिळाला. फार पाऊस असताना थांबावं लागलं, कमी पावसात सायकल चालवता आली. अहिल्यानगरला पोहचण्याच्या आधी कामरगांवमध्ये विद्यार्थ्यांना भेटता आलं. जुन्या सुहृद डॉ. सविताताईंनी विद्यार्थ्यांसोबत भेट घडवून आणली. त्यांनी घरच्यासारखी व्यवस्था केली. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. पहिल्या दिवशी साडेपाच तासांच्या आत राईड पूर्ण झाली. म्हणजे पुण्याहून बसने नगरला जाताना लागतो त्याच्या दुपटीहून कमी वेळ! सायकलिंगचा सराव चांगला असेल तर सायकल ही अगदी स्कूटीसारखी धावते. अहिल्यानगरमध्येच डॉ. विलास जाधव सर भेटले. त्यांचं मार्गदर्शन मिळालं.

दुसर्‍या दिवशी पाऊस कमी पण चिखल फार होता. मेरीडा सायकलीला मड गार्ड नसल्यामुळे चिखलाची सारखी आंघोळ होत होती. इतकी की, बाजूने जाणारे सांगायचे चिखल लागलाय. योगाच्या दृष्टीने चिखलातूनच कमळ उगवतं! त्यामुळे चिखलाचा त्रास वाटला नाही. अहिल्यानगरच्या पुढे करंजीचा घाट सुंदर होता. खूप वेळ रस्ता ढगातून जात होता. निसर्गाच्या सान्निध्यात सायकल चालवण्याचा पुरेपूर आनंद घेता आला. पाथर्डीच्या पुढे खरवंडीपासून बीडकडे जाणारा मधला रस्ता घेतला. नकाशात तोही राष्ट्रीय महामार्ग दिसत होता. काही ठिकाणी चांगला रस्ता होता. पण मध्ये मध्ये त्यावर जे डायवर्जन्स आणि दगडी पॅचेस होते, तिथे मात्र सायकलीला अनेक धक्के सहन करावे लागले! वनडे मॅचमधला पॉवर प्ले संपून एकदम कसोटी क्रिकेट सुरू झालं. उखडलेला कच्चा रस्ता, चिखल आणि धुळ! चिखलाचं सचैल स्नान सुरू राहिलं! बीडच्या अलीकडे १२ किलोमीटरपर्यंत ही स्थिती राहिली. परिसर मात्र अतिशय सुंदर आणि शांत. सगळीकडे डोंगर रांगा आणि हिरवागार निसर्ग! रस्ता मात्र संयमाची परीक्षा घेणारा. 

अशा रस्त्यांवर जेव्हा कधी ताण होतो, तेव्हा त्यावर एक सोपा उपाय करता येतो. मनातल्या मनात एखादं गाणं सुरू करायचं. कानाचं पाठांतर चांगलं असेल तर आवडती गाणी डिट्टो ऐकता येतात. आणि अशा गाण्याकडे लक्ष गेलं की, खड्ड्यांचा किंवा चिखलाचा त्रास जाणवेनासा होतो. त्या त्रासावरची धारणा जाते आणि धारणेला दुसरा विषय मिळतो. मनातल्या मनात आवडीचं गाणं ऐकत १० किलोमीटर आरामात पूर्ण होतात. बाजूने जाणार्‍या ट्रॅक्टरच्या गाण्यामुळेही ऊर्जा मिळते. आणि जरी रस्ता अडचणीचा असेल तरी आजूबाजूचा बदलणारा आसमंत आपल्या विचारांना ब्रेक लावतो आणि मन शांत होतं. निसर्गातला आल्हाद अनुभवता येतो.

वाटलं नव्हतं बीडचा परिसर इतका डोंगराळ आहे म्हणून! सगळीकडे डोंगर आहेत. बीडला पोहचायला अपेक्षेपेक्षा उशीर झाला. बीडमध्ये रवींद्र देशमुख सर भेटले. वेलणकर आणि परभणी म्हंटल्यावर त्यांनी थेट विचारलं, नाना वेलणकरांचा नातू का? आजोबांनी ४० वर्षांपूर्वी दिनदयाल केंद्राचं काम केलं तेव्हा ते तरुण होते! त्यांच्याच माध्यमातून ध्येयपूर्वी वस्तीगृहाच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद करता आला.

तिसर्‍या दिवशी टप्पा मोठा होता, पण रस्ता चांगला असल्यामुळे सोपा जाईल असं वाटलं. बीडवरून सकाळी सहाला निघालो. तिसर्‍या दिवशी अखेरीस कोरडा रस्ता मिळाला. बीड- वडवणी- तेलगांव- माजलगांव- पाथ्री- परभणी असा रस्ता होता. पण तेलगांवपर्यंत सतत डायवर्जन्स आणि दगड- चिखलयुक्त रस्ते! अशा रस्त्यांवर सायकलीवर बसवलेलं सामानही हलत होतं आणि परत परत ठीक करावं‌ लागत होतं. शिवाय सायकलिंगची लयही तुटत होती. हळु हळु तो टप्पा पार झाला. ह्या टप्प्यावर गावांची नावं खूपच मजेशीर होती! चिंचवड, परभणी तांडा, कल्याण नगर!

तेलगांवनंतर मात्र सुसाट रस्ता मिळाला तो थेट परभणीपर्यंत! ठराविक अंतरानंतर थोडा थोडा नाश्ता करून रिफ्युएल करत राहिल्यामुळे थकवा आला नाही आणि मस्त वेग मिळाला. पाथ्रीमध्ये परभणीच्या निरामयचे योग शिक्षक भेटले. थोडा वेळ भेट झाली आणि निघालो. ह्याआधीही परभणी- पाथ्री सायकलिंग केलं असल्यामुळे घराच्या जवळ आल्याचा भाव जाणवला. परभणीच्या ओढीमुळे पुढचं अंतर लवकर संपलं. आणि त्याच ओढीमुळे निरामयचे सुहृद वाट पाहात थांबले होते. परभणीमध्ये पोहचता पोहचता आप्त मंडळींच्या भेटीमुळे ऊर्जा मिळाली. 

ह्या तीन दिवसांच्या राईडमध्ये अनेक गोष्टी अनुभवता आल्या. त्या आधारे आता पुढच्या महिन्यात सुरू होणार्‍या दक्षिण भारतीय सायकल अभियानाचं नियोजन सुरू आहे. "निरामय"चं हे सायकल अभियान बंगलोरवरून सुरू होईल. बंगलोर- मैसूर- उटी- ईशा आदि योगा- कोची- कन्याकुमारी- रामेश्वरम- पुद्दुचेरी- चेन्नै असं साधारण १८५० किलोमीटर अंतर असेल. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे! एक एक पाऊल व्यवस्थित उचललं तर आपोआप पुढचा मार्ग मिळत जातो. त्या अभियानाचे डिटेल्स लवकरच कळवेन. धन्यवाद.

-निरंजन वेलणकर 09422108376. आकाश दर्शन, ध्यान, फन- लर्न, फिटनेस सत्रे. लिहीण्याचा दिनांक: 28 जुलै 2025. 

No comments:

Post a Comment

Thanks for reading my blog! Do share with your near ones.